पर्यटनासाठी जवळचे एखादे मस्त ठिकाण असेल तर वीकेंडला पटकन जाऊन येता येते. पण काही ठिकाण अशी आहेत जी त्या भागात गेल्याशिवाय अनुभवता येत नाहीत. म्हणजे पाहा, एखादं बेट असेल, तर तिथं जाऊन आल्याशिवाय का ते आपल्याला भुरळ पाडेल की नाही हे कसं कुणी सांगू शकेल? तसं पाहयाला गेलं तर सहसा बेटावर असलेली रिसॉर्टस् पर्यटकांना नेहमी आकर्षित करतात. अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये अशी अनेक सुंदर रिसॉर्ट्स आहेत. पण महाराष्ट्रात अजूनतरी सर्व सोयीसुविधा असलेले पर्यटन स्थळ असलेले बेट नाही. असा विचार करत असाल तर थांबा! तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात असे बेट नव्याने विकसित केले जाणार आहे. हे बेट पर्यटकांसाठी सर्व सोयी सुविधा खास बनवले जात आहे.
वसई खाडीवरील 'पंजू बेट' हे महाराष्ट्रातील एकमेव बेट आहे, जे पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनणार आहे. त्यासाठी नायगाव आणि भाईंदर दरम्यान वसलेली ६०० एकर जमीन वापरली जाणार आहे. पंजू बेटाचे सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या बेटाची लोकसंख्या १५०० आहे आणि वसई शहरापासून हे बेट अवघ्या १० किमी अंतरावर आहे. नायगाव जेट्टीवरून फेरी बोटींद्वारे सात मिनिटांत तिथे पोहोचता येते. भारतातील २६ बेटं नव्याने विकसित करण्यात येणार आहेत, त्यातील महाराष्ट्रात पंजू बेट हे एकमेव आहे.







