मोठ्या शहरांमधले भिकारी हे एक वेगळंच प्रकरण असतं. मुंबईचं उदाहरण घ्या. इथे काही असे भिकारी आहेत ज्यांनी लाखोंची माया जमा करून ठेवली आहे. खरं वाटत नसेल तर नुकताच घडलेला हा किस्सा वाचा.
मुंबईच्या भिकाऱ्याकडे सापडलं घबाड....किती रक्कम आहे पाहा !!


४ ऑक्टोबर रोजी गोवंडी आणि मानखुर्द स्टेशनच्या दरम्यान रेल्वेरूळ ओलांडताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्याबद्दल माहिती काढल्यावर समजलं की त्याचं नाव बिरजू चंद्र आझाद आहे आणि तो भिक मागून गुजराण करतो
यानंतर त्याच्या घराचा पत्ता शोधण्यात आला. गोवंडीच्या झोपडपट्टीत तो राहत होता. पोलीस त्याच्या घरी पोचले तेव्हा घरी कोणीच नव्हतं. पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली. झाडाझडतीत झोपडीत जे सापडलं ते बघून पोलीसही थक्क झाले. ८.७७ लाख रुपये किमतीच्या मुदत ठेवीचे कागदपत्र आणि १.५ लाख रुपये किमतीची चिल्लर असे मिळून जवळजवळ १० लाख रुपयांचा ऐवज झोपडीत होता.

बिरजूने आपल्या झोपडीत चिल्लरच्या गोण्या भरून ठेवल्या होत्या. हे सर्व चिल्लर मोजता मोजता पोलीसही हैराण झाले होते.
पोलीस सध्या बिरजूच्या घरच्यांचा शोध घेत आहेत. त्याच्या सर्व ठेवी सांभाळून ठेवण्याचं बँकांना सुचवण्यात आलंय. तसेच चिल्लरही सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

तशी ही पहिलीच घटना नाही. काही वर्षपूर्वी तर अशा श्रीमंत भिकाऱ्यांची यादीच व्हायरल झालेली. भरत जैन नावाच्या भिकाऱ्याचं उदाहरण बघू. मुंबईतील परळ भागात त्याचे २ फ्लॅट्स आहेत. शिवाय ७० लाख रुपयांची रोख रक्कम आहे ती वेगळीच. हे आकडे जुने आहेत. आता त्यांच्यात बदल नक्कीच झाला असेल.
...पण प्रश्न अजून अनुत्तरीत आहे. हे लोक एवढे पैसे कमावतात कुठून ? तुम्हाला काय वाटतं, भिक मागून एवढी माया जमवता येते का ? तुमचं मत नक्की द्या !