१९९९ साली परभणी जिल्हा विभागला गेला आणि हिंगोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. मराठवाड्याच्या उत्तरेकडे असलेले हिंगोली निर्मितीच्या २३ वर्षांनंतर आज कसे आकाराला आलेले आहे हे आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.
हिंगोलीचा भाग निजामाच्या राज्यात येत होता. या भागात त्याकाळी दोन मोठी युद्धे झाली. १८०३ साली टिपू सुलतान- मराठा युद्ध आणि दुसरे १८५७ साली नागपूरकर आणि भोसले यांच्या दरम्यान झालेले युद्ध. या भागात निजामाचे लष्करी ठाणे होते. या कारणाने या भागाला त्याकाळी मोठे महत्व होते. तेव्हा काही भागांना तोफखाना, सदरबाजार, पेन्शनपुरा, रिसाला असे नाव पडले. ती नावे आजही प्रचलित आहेत.
निजामापासून स्वतंत्र झाल्यावर १९५६ साली हिंगोली जिल्ह्याचा भाग हा मुंबई राज्यात समाविष्ट झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी परभणी जिल्ह्यात हिंगोली येत होते. १९९९ साली १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी परभणी जिल्ह्यातून हिंगोली वेगळा झाला. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, औंढा नागनाथ, बसमत, सेनगाव, हिंगोली असे ५ तालुके आहेत.



