पश्चिम बंगालमध्ये पाच कांगारू सापडलेत!! हे कसं शक्य आहे? यामागे कोणतं आणि कशाप्रकारचं रॅकेट असू शकेल?

लिस्टिकल
पश्चिम बंगालमध्ये पाच कांगारू सापडलेत!! हे कसं शक्य आहे? यामागे कोणतं आणि कशाप्रकारचं रॅकेट असू शकेल?

ही गोष्ट आहे वाट चुकलेल्या कांगारूंची. तुम्ही बरोबर वाचलंत, कांगारूच! कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा, पण गेल्या महिन्यात तो चक्क भारतात आढळून आला. हजारो किलोमीटर दूर असलेल्या ऑस्ट्रेलियातून हे इथपर्यंत कसे आले? उड्या मारत नक्कीच आले नाहीत! हे एक मोठे कोडे आहे. पण त्या निमित्ताने माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांना कसा वेठीला धरू शकतो हे समोर आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलात कुणा ड्रायव्हरला एका आडवाटेला कांगारूंची जोडी उड्या मारताना दिसली आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. नंतर अजून काही माणसे तिथे जमली आणि आश्चर्य, उत्सुकता, आनंदाच्या आरोळ्यांनी परिसर निनादला. या बघ्यांनी ही नवलाई आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात टिपली आणि शेअर केली. त्यानंतर त्यांच्यापैकीच कुणीतरी फॉरेस्ट रेंजर्सना या कांगारूबद्दल कळवले. रेंजर्स त्यांच्या सुटकेसाठी निघाले. दरम्यान या लोकांनी कांगारूंना जमेल तसे खायला घातले. थोड्याच वेळात त्यांच्या सुटकेसाठी निघालेली वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम तेथे येऊन पोहोचली आणि त्यांनी या कांगारूंना ताब्यात घेतले. त्यांची नावे ॲलेक्स आणि झेवियर अशी ठेवली गेली.

ही टीम जेव्हा कांगारूंना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्यापाशी पोहोचली तेव्हा हे प्राणी भयभीत, गोंधळलेले होते. प्रत्यक्षात त्यांच्या सुटकेसाठी आलेली माणसेदेखील थोडी बावचळलेलीच होती. कारण याआधी कांगारू त्यांनी कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे त्याला कसे हाताळायचे याची त्यांना माहिती नव्हती.

दुसऱ्याच दिवशी साधारण ३७ किलोमीटर अंतरावर असलेल्या देबग्राम या गावात असाच प्रकार घडला. तेथे एक कांगारू आणि एका पिल्लाचे अवशेष वन कर्मचाऱ्यांना सापडले. त्याच्या तीन आठवडे आधी हैदराबादच्या दोघाजणांना कांगारूची तस्करी केल्यामुळे अटक करण्यात आली होती. थोडक्यात, बंगालच्या उत्तर भागात गेल्या महिन्यामध्ये एकूण पाच कांगारूंना वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. यामागे कांगारूंची तस्करी करणारे एखादे रॅकेट कार्यरत असावे असा संबंधितांचा संशय आहे.

जंगली प्राण्यांची तस्करी हे आपल्याकडे नवीन नाही. फक्त यावेळी तस्करीसाठी आलेला माल वेगळा आहे. याआधी ज्या प्राण्यांची तस्करी केली जायची त्यात कांगारू कधीही नव्हते, ते पहिल्यांदाच घडले आहे. वन्यजीव तस्करी हा संपूर्ण जगातला तेजीतला धंदा. जिवंत प्राणी आणि प्राण्यांचे अवयव दोन्हींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली किंमत आहे. हस्तिदंत, गेंड्याचे शिंग, सापाची कात त्याचप्रमाणे वन्य जीवांच्या दुर्मिळ प्रजाती यांच्या तस्करीतून दरवर्षी करोडोंची उलाढाल होते. एक्झॉटिक पेट्स असे गोंडस लेबल लावून त्याखाली केवळ हौसेपोटी हजारो लोक हे लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी पाळतात आणि या बेकायदेशीर धंद्याला एक प्रकारे प्रोत्साहन देतात. त्यात मकाऊ, स्टार टॉर्टॉईज, लेमूर, गिब्बन, कोल्हे, कुकाबुरा, विविध प्रकारचे साप, कोळी, मार्जारवर्गातले प्राणी आणि अनेक परदेशी प्राणी यांचा समावेश आहे.

सहसा कुठेही न आढळणारे हे प्राणी, पक्षी या लोकांकडे येतात कुठून? तर जवळपास प्रत्येक शहरात या प्राण्यांची दलाली करणारा किमान एक तरी दलाल असतो. तुम्ही फक्त नाव घ्यायचा अवकाश, तो कुठून तरी तो प्राणी-पक्षी तुम्हाला आणून देतोच देतो. फक्त योग्य ती किंमत मोजायची तुमची तयारी पाहिजे. हा व्यापार अलीकडे चांगलाच जोमाने फोफावला आहे. आपल्याकडे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय लोक ओव्हर द काउंटर औषधे घेतात, तशातलाच हा प्रकार आहे.

त्यातूनच कांगारूची तस्करी झाली असावी असे मानायला वाव आहे. पण कांगारूच का? या प्रश्नाला वेगवेगळी उत्तरे असू शकतात. एका अंदाजानुसार त्यांचा वापर औषधांचे टेस्टिंग करण्यासाठी प्रयोगशाळेत केला जाऊ शकतो. स्वित्झर्लंडमधील फार्मास्युटिकल आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये हे कांगारू त्यांची औषधे आणि सौंदर्यप्रसाधने टेस्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. त्याखेरीज त्याचा औषध म्हणूनही वापर करता येऊ शकतो. विशेषतः चीन आणि पूर्व आशियाई देशांमध्ये अजूनही पारंपरिक औषधींचा बऱ्यापैकी वापर केला जातो. त्यामुळे पारंपरिक औषधे देणारे वैदू, जडीबुटीवाले यांचा तिकडे बऱ्यापैकी प्रभाव आहे. ही मंडळी उपचार करण्यासाठी विविध प्राण्यांचे अवयव, मांस वापरतात. याचेच एक उदाहरण म्हणजे पूर्वी आपल्याकडे झालेली गेंड्यांची बेसुमार कत्तल. चीनसारख्या देशांमध्ये विविध रोगांवर इलाज म्हणून, बाळंतपण सुखरूप पार पडण्यासाठी, पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी(!) गेंड्यांचे शिंग, मूत्र इत्यादींचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या देशात गेंडा लुप्त होण्याच्या मार्गावर होता. अशाच कारणासाठी कांगारूंची तस्करी केलेली असण्याचाही संभव आहे. याशिवाय वाघ, बिबट्या, मांजर, घुबड यांनाही माणसाने आपल्या स्वार्थासाठी वेठीला धरलेले आहे. याच यादीमध्ये आता कांगारूंचा समावेश झाला असण्याची शक्यता आहे.

वन्यजीव तस्करी दोन प्रकारची असते, एक म्हणजे प्रत्यक्ष जिवंत प्राण्यांची तस्करी आणि दुसरे म्हणजे प्राण्यांच्या अवयवांची तस्करी. या तस्करीचे जाळे फार मोठे आणि गुंतागुंतीचे आहे. ड्रग्जच्या तस्करीप्रमाणेच येथेदेखील अनेक लोकांची साखळी कार्यरत असते. त्यात प्रत्यक्ष स्मगलिंग करणारे लोक असतात, तसेच ट्रक आणि जीप चालवणारे, प्राण्यांचे पिंजरे बोटीतून बाहेर काढणारे, ते इतर ठिकाणी वाहून नेणारे लोकही असतात. कित्येकदा या चालक-वाहकांना प्रत्यक्ष गिऱ्हाईक कोण आहे हेसुद्धा माहिती नसते. शिवाय या लोकांचे स्वतःचे असे अलिखित संकेत आहेत. संवादासाठीदेखील ते सांकेतिक भाषेचा उपयोग करतात. त्यामुळे तस्करांचे हे जाळे खणून काढणे अतिशय अवघड, जवळपास अशक्य, आहे. या साखळीमध्ये भ्रष्ट अधिकारीदेखील गुंतलेले असल्याने साखळी तोडणे अजूनच मुश्किल झाले आहे.

पश्चिम बंगालचे भौगोलिक स्थान यासाठी विशेष महत्त्वाचे ठरते. सिलिगुडीहून पुढे भूतान, नेपाळ, बांगलादेश अशा ठिकाणी हा माल पाठवला जातो. आपल्या देशात एखादा प्राणी देशाच्या हद्दीत शिरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर काही ऍक्शन घेता येत नाही, कारण अजूनही तसा लिखित कायदा आपल्याकडे नाही. यामुळे ही तस्करी पूर्णतः रोखणे अवघड आहे.

रस्त्यापलिकडे सापडलेल्या कांगारूंच्या निमित्ताने एका प्रश्नाला नव्याने वाचा फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

स्मिता जोगळेकर