कारगिल युद्धात शहिद झालेल्या मेजर पद्मपाणी आणि पत्नी चारुलतांची हृदय हेलावणारी प्रेमकथा!!

लिस्टिकल
कारगिल युद्धात शहिद झालेल्या मेजर पद्मपाणी आणि पत्नी चारुलतांची हृदय हेलावणारी प्रेमकथा!!

१९९९ साली पाकिस्तानने कारगिल युद्धात केलेली आगळीक भारताने चांगलीच जिरवली होती. या गोष्टीला आता २२ वर्षं झाली आहेत. कारगिल विजयात अनेक शूर आणि धाडसी सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. या युद्धात आपले ५२७ सैनिक शहीद झाले होते.

कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या त्यागाच्या आणि शौर्याच्या कथा आजवर अनेक वेळा तुम्ही वाचल्या असतील. कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणी शेरशाह या सिनेमातून सर्वांसमोर आली आहे. राजपूताना रायफल्सचे वीर सैनिक मेजर पद्मपाणी आचार्य यांची गोष्ट मात्र अजून लोकांपुढे आलेली नाही.

पाकी आक्रमणाला उत्तर देताना पद्मपाणी आचार्य यांना २८ जून १९९९ रोजी हौतात्म्य आले होते. कारगिलच्या तोलोलिंग येथे ते शहीद झाले होते. त्यांच्या याच शौर्याचा सन्मान आचार्य यांना मरणोत्तर महावीर चक्र हे पदक देऊन करण्यात आला होता. महावीर चक्र हे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे शौर्यपदक आहे.

आचार्य मूळ ओडिशाचे. मात्र ते हैदराबाद येथे लहानाचे मोठे झाले. तिथेच शिक्षण पूर्ण करून ते सैन्यात भरती झाले. १९९४ साली मद्रास येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी येथे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आता त्यांचा सैन्यासोबत प्रवास सुरु झाला होता. आता याच काळात त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.

सैनिकाचे आयुष्यात प्रवास हा नेहमीचाच. असेच एकदा प्रवासात असताना त्यांना त्यांच्या पुढे झालेल्या पत्नी चारुलता भेटल्या. चारुलता एके ठिकाणी सांगतात की पद्मपाणी हे यावेळी इतर लोकांच्या मदतीत गुंग होते. आपले काम आटोपल्यावर ते योगायोगाने चारुलता यांच्या बाजूला जाऊन बसले.

अशाप्रकारे एकमेकांसोबत बोलत त्यांचा प्रवास सुरु झाला. या गप्पा मात्र रात्रभर सुरू होत्या. मेजर आचार्य जेव्हा रेल्वेतून उतरले तेव्हा त्यांनी आपल्या सीटवर एक पुस्तक ठेवले. या पुस्तकात त्यांनी स्वतःचा नंबर लिहून ठेवला होता. आता चारुलता प्रचंड खुश झाल्या होत्या. त्यांनी त्या नंबरवर कॉल केला तर तो उचलला मेजर साहेबांच्या आईंनी. मेजर साहेबांच्या आईनी चारुलता यांना आपल्याला सर्व माहिती असल्याचे सांगितले.

चारुलता यांना हिंदी येत नसूनही त्यांनी मेजर आचार्य यांच्यासाठी हिंदी शिकून घेतली. दोन्ही परिवारांमध्ये बोलणे होऊन मग त्यांचे १९९६ साली लग्न झाले. चारुलता सांगतात, मेजर आचार्य मनाने खूप चांगले होते. ते नेहमी सुट्यांवर येऊन सरप्राईज देत असत. सुखी संसार सुरू होता.

लग्नाला ३ वर्षं झाली. तेव्हाच मेजर आचार्य यांना कारगिल युद्धासाठी बोलावणे आले. चारुलता तेव्हा गरोदर होत्या. मेजर आचार्य युद्धासाठी निघाले. आपल्या होणाऱ्या अपत्याची काळजी घे असे सांगून ते युद्धावर गेले. चारुलता सांगतात की त्यांना देशाप्रती प्रचंड प्रेम होते.

याच दरम्यान एक धक्कादायक बातमी येऊ धडकली. असामान्य शौर्याचे प्रदर्शन करत असताना मेजर आचार्य धारातीर्थी पडले आहेत. ही बातमी ऐकून चारुलता या पूर्णपणे तुटून पडल्या. कित्येक दिवस या धक्क्यातून त्या सावरल्या नव्हत्या.

मेजर आचार्य शहिद झाल्यावर ३ महिन्यांनी त्यांना मुलगी झाली. या मुलीचे नाव त्यांनी 'अपराजिता' ठेवले आहे. या मुलीकडे बघून चारुलतांनीआपले पुढील जीवन जगण्याचा निर्णय घेतला. त्यांना दुसरे लग्न करण्यासाठी अनेक लोकांनी गळ घातली, पण चारुलता यांनी मेजर आचार्य यांच्या आठवणीत जगण्याचा निर्णय घेतला.

मेजर आचार्य यांची मुलगी अपराजिता आपल्या बाबाचा चेहराही बघू शकली नाही. मेजर आचार्य आपल्या शौर्याने इतिहासात अमर झाले आहेतच, पण त्यांची प्रेमकहाणी आणि चारुलता यांचा त्यागही अमर झाला आहे.

उदय पाटील