'ग्रीन एनर्जी'साठी रिलायन्स ७५००० कोटी का गुंतवणार आहे ? समजून घ्या 'गेम' काय आहे .

लिस्टिकल
'ग्रीन एनर्जी'साठी रिलायन्स ७५००० कोटी का गुंतवणार आहे ? समजून घ्या 'गेम' काय आहे .

एकाच दिवसात रिलायन्सच्या शेअर्सचे भाव खाली का उतरले? शेअर्सचे भाव खाली वर होणाचे हे टेक्निक समजून घ्या!!

 

माणसं कंपन्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला का जातात? एलआयसी आणि बँकांमध्ये काम करणारी बरीच मंडळी निव्वळ कर्तव्य म्हणून या सभेला जातात. म्युच्युअल फंडांच्या मॅनेजर्सना थोडंसं चमकायचं असतं म्हणून ते जातात. बर्‍याच जुन्या भागधारकांना आम्ही किती जुने  मेंबर आहोत हे सांगायचं असतं म्हणून जातात. पत्रकारांना सभा संपल्यावर काहीतरी 'खास' मिळणार असतं म्हणून ते जातात. बरीचशी मंडळी सभा संपल्यावर मिळाणार्‍या 'चहापाना'साठी जातात. तर काहीजण चार नव्या ओळखी होतील म्हणून जातात. बर्‍याच कंपन्या जमलेल्या मंडळीना काहीतरी गिफ्ट देतात म्हणून काहीजण जातात. एकेकाळी एक साखरेची कंपनी प्रत्येकाला २ किलो साखर भेट द्यायची. नव्याने आलेल्या कंपन्या शेअरहोल्डर्सना त्यांची फॅक्टरी दाखवायला घेऊन जातात. दोन दिवस फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य, एक  दिवस फॅक्टरी आणि दुसर्‍या दिवशी पर्यटन असं सगळं फुकटात मिळायचं म्हणूनही लोकं सभेला जातात. थोडक्यात प्रत्येकाचा जाता जाता  काही तरी घेऊन जाण्याचा उद्देश असतो. 
पण काही अभ्यासू लोक कंपनी पुढे काय करणार आहे हे समजण्यासाठी जातात. काही वर्षांपूर्वी 'इन्फोसीस'च्या वार्षिक सभेला जाणारे शेअरहोल्डर केवळ नफ्याचे आकडे ऐकायला नाही, तर नारायणमूर्तींचा 'गायडन्स' ऐकायला जायचे. आता गेली काही वर्षं मुकेश अंबानींचे भाषण 'गायडन्स'पेक्षाही 'गेमप्लॅन' साठी ऐकले जाते. तर यावर्षी मुकेश अंबानी यांनी सादर केलेला रिलायन्सचा 'गेम' उलगडून सांगण्यासाठी हा आजचा लेख आहे.

पण तुम्ही बघताय की ही सर्वसाधारण सभा जशी आटपत आली तसा रिलायन्सचा भाव खाली उतरत गेला. आता गेले चार दिवस तर हा भाव वारकरी पंथात सामील झाल्यासारखा ग्यानबा म्हटलं की दोन पावलं पुढे आणि तुकाराम म्हटलं की एक पाऊल मागे असा चालला आहे. रिलायन्स ज्या ज्या क्षेत्रात आहे,।त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांची ग्रोथ चांगली झाली आहे, नफा पण भरघोस झालेला दिसतोय. तरी पण गुंतवणूकदारांची माया पातळ झालेली दिसते आहे?

या आधीच्या लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे रिझल्ट कळल्यावर भाव पडणार हे नक्कीच होतं, पण आता दिर्घ मुदतीत मात्र  जे घडणार आहे ते समजणं कठीण आहे. 'गेम 'काय आहे हे समजायचं असेल तर सगळं काही 'इसकटून' सांगावं लागेल. मुकेश अंबानी यांनी तब्बल  ७५,००० कोटी रुपये 'ग्रीन एनर्जी' क्षेत्रात गुंतवण्याचे नक्की केले आहे. 'ग्रीन एनर्जी' हा एक नवा फंडा आहे. त्याचा थेट सबंध पॅरीस कन्व्हेन्शन -ग्लोबल वार्मींग- ग्रीन हाऊस गॅसेस सोबत आहे.  ते आधी समजून घेऊया. 
जगात औद्योगीक क्रांती जशी झपाट्याने झाली त्या प्रमाणात आपल्याला अधिकाधिक सोयी -सुविधा -रोजगार मिळत गेले. हे मिळताना आपण नैसर्गिक संपत्तीचा बळी देत गेलो. हे सुरुवातीला आपल्या लक्षात आलं नाही आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा बराच उशीर झाला होता. औद्योगीक क्रांतीपूर्वीचे हवामान आणि आताचे हवामान यात  उष्णतेच्या २ अंशाचा फरक पडला होता. म्हणजेच आपल्या भोवतालचे वातावरण कायमस्वरुपी २ अंशाने गरम झाले होते. आता सहज विचार हा येतो की या २ अंशाने काय मोठा फरक पडणार आहे? पण फरक आधीच पडला आहे. ध्रुवीय प्रदेशातले हिमनग वितळायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच पिण्याच्या लायकीचे पाणी समुद्रात मिसळते आहे. आधीच एकूण पाण्याच्या २% पाणी आपल्याला प्यायला मिळते आहे. तेच खारट होत गेले की प्यायचे काय? समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत जाते आहे. अकाली पाऊस, पूर, उष्णतेच्या लाटा आणि सोबत वाढत जाणारी रोगराई असे सगळे अनाकलनीय अनुभव आपल्या वाट्याला ग्लोबल वार्मींगमुळे येणार आहेत. आपले अस्तित्वच धोक्यात येणार आहे. आणि याला आपणच जबाबदार आहोत.

हे लक्षात आल्यावर २०१५ साली पॅरिस इथे १९७ देशांनी एकत्र येऊन पर्यावरणासाठी काही महत्वाचे बदल करण्याचे नक्की केले आहे. हे बदल करायचे म्हणजे नक्की काय करायचे? तर वातावरणात साठणार्‍या ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण कमी करायचे. 
 हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत तरी कोणते तर त्याची ढोबळ यादी अशी आहे :कार्बन डाय ऑक्साइड- मिथेन- ओझोन -नायट्रस ऑक्साइड- क्लोरो फ्लुरो कार्बन. हे वायू सूर्यकिरणातून येणारा उष्मा धरून ठेवतात आणि त्यामुळे तापमान कायमचे बदलते. हे गॅस येतात कुठून? तर त्यात अधिकाधिक गॅस पेट्रोकेमिकल उद्योगातून येतात. म्हणजेच या बदलाला पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीत असलेल्या कंपन्याच जबाबदार आहेत. म्हणजेच भारतासारख्या कृषीप्रधान देशात जर हवामान बदल घडत असेल तर याच पेट्रोकेमीकल उद्योगामुळे आणि त्या एक नंबर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज! थोडक्यात, हे ७५,००० कोटी ग्रीन एनर्जी म्हणजे पर्यावरणपूरक स्वच्छ उर्जेसाठी वापरणे ही रिलायन्सची जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्यांनी वेळीच पार पाडली तर येणार्‍या शतकात रिलायन्स इंडस्ट्रीज टिकून राहील. पॅरिस कन्व्हेन्शन्मध्ये ठरवलेल्या काळाच्या आधीच १० वर्षे हे साध्य करण्यासाठी ७५,००० कोटींचा कोंबडा रिलायन्स कापणार आहे हे लक्षात घेऊया!  हे नाही केले तर आपली पिढी म्हातारी होऊन मरेल, पण आपली पुढची पिढी प्रदूषणाने मरेल!

तर काही वर्षांपूर्वी ग्रेटा थुनबर्ग नावाच्या मुलीने जगातल्या विचारवंतांना आणि राजकारण्यांना हाणलेली चपराक आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेचा वृतांत याचा असा जवळचा संबंध आहे.
७५,००० कोटींचा खेळ तर मांडला पण हे पैसे येणार आहेत कुठून? त्यासाठी रिलायन्सने दुसरी एक 'गेम' केली. त्यांच्या व्यवसायाचा २०% भाग त्यांनी सौदी अरेबियाच्या अ‍ॅरेमॅको देऊ केला आहे. या २०%च्या वाटाघाटी गेली दोन वर्षे चालू होत्या. पण तेव्हा रिलायन्सच्या डोक्यावर कर्जाचा बोजा होता. म्हणून गेल्या वर्षभरात'जीओ'मध्ये अनेकांना सहभागी करून कर्ज संपवण्यात आले.कर्ज संपल्यावर अ‍ॅरॅमॅको समोर रिलायन्स ताकदीने उभी राहिली आणि त्यांना हवी तशी सोयरीक जुळवून आणली. साहजिकच येत्या काळात भरपूर भांडवल  कंपनीकडे येईल आणि ग्रीन एनर्जीचा प्रकल्प पुढे जाईल.  रिलायन्स पेट्रोकेमीकल उद्योगातून बाहेर पडेल असा  याचा अर्थ असा नाही. परंतू येणार्‍या काळात रिलायन्स पर्यावरणवादी कंपनी म्हणून ओळखली जाईल.त्यासाठी मध्यंतरात बरीच वर्षे जातील. ७५००० कोटी खर्च करून 'तुरंत दान महापुण्य' इतकेच साध्य होणार आहे.
 
आता शेअर बाजार याचा अर्थ असा घेते की सध्या काही वर्षांसाठी रिलायन्सचा 'पार्टी टाइम' संपला आहे. त्यामुळे ताबडतोब नफ्याच्या शोधात असलेले गुंतवणूकदार शेअर विकत आहेत. 
 

इतकी साधी सोपी गेम असेल तर ती रिलायन्स कसली ? रिलायन्सला येत्या काळात आपण सगळेच पैसे देणार आहोत -भांडवल पुरवणार आहोत ! ते कसे  ते आता वाचा ! 
रिलायन्सने धीरूभाई अंबानींच्या काळात एका पिढीला शेअरबाजारात आणलं. गुंतवणूकदारांचा एक पंथच उभा केला.आता मुकेश अंबानी  जे करत आहेत ते थेट तुमच्या माझ्या जगण्याशी जोडलं जात आहे.सुरुवात 'जीओ'पासून झाली.एक संपूर्ण पिढी 'जीओ'सोबत जोडली गेली.त्यानंतर रिलायन्स रिटेल आलं आणखी काही लोकं जोडली गेली. कोव्हीडमुळे थांबलेलं रिलायन्स फायबर आलं की सगळी घरं जोडली जातील.दुसर्‍या हाताने मुकेश अंबानींनी 'जीओ' सोबत फेसबुक-गुगलसकट सगळ्यांना भागीदारी देऊन त्यांनाही खेळात सामील करून घेतलं.थोडक्यात तुम्ही कुठेही जा 'जीओ'चा सर्वव्यापी संचार तुमच्या सोबत असेलच. म्हणजेच तुम्ही जरी नाही तरी तुमच्या घरातील पुढची पिढी रिलायन्सच्याच सोबत असेल !    
आजच्या लेखात आपण येत्या काळाचा  एक धावता आढावा घेतला आहे. ग्रीन एनर्जीचे स्वप्न रिलायन्स कसे साध्य करणार आहे ते आपण बघू पुढच्या भागात