(या कटातली एक आरोपी नलिनी २०१९मध्ये पॅरोलवर सुटली तेव्हाचे छायाचित्र)
धूर पुरता विरला अणि तिथं एकच गदारोळ उडाला. भेदरलेले कितीतरी पोलीस आणि कार्यकर्ते पळत सुटले. काहींनी तर आपल्या किंवा दुसऱ्याच्या वाहनातून त्या ठिकाणापासूनच पळ काढला. मात्र मोजके कार्यकर्ते आणि अधिकारी पाय रोवून उभे राहिले. मूपनार आणि राममूर्ती यांचे डोळे राजीव गांधींचा शोध घेत होते. स्फोट झाला, त्या क्षणी राममूर्ती व्यासपीठावर होते; तर मूपनार इंदिराजींच्या पुतळ्याकडून चालत सभास्थानाकडे येत होते. स्फोटाच्या ठिकाणी दोघे पोहोचले, तेव्हा त्यांना राजीव गांधींचा छिन्नविच्छिन्न देह पाहावा लागला. त्यांची ओळख पटवणारी सर्वांत सोपी खूण त्यांच्या पायातले 'लोटो'चे शूज ठरले!
हबकलेल्या मूपनार यांनी राजीव गांधींचं पालथं शरीर सावरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या हातात निव्वळ मांस आलं. मूपनार आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर घाईघाईनं शाल पांघरली आणि राजीवजींचा अचेतन देह कसाबसा उताणा केला. स्ट्रेचर मागवण्यात आलं. राजीवजींचा अचेतन देह जिथे पडला होता, तिथल्या लाल गालिच्यानंही पेट घेतला होता. ती छोटीशी आग राघवन यांनी पायानं विझवून टाकली. या स्फोटातनं शाबूत राहिलेला पुराव्याचा प्रत्येक धागा-दोरा जपणं ही आपलीच जबाबदारी आहे, याचं भान त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला होतं. तपास सुरू झाल्यावर छोटे छोटे तपशीलही महत्त्वाचे ठरणार होते. उत्तरीय तपासणीसाठी राजीव गांधींचा देह पोलीस व्हॅनमधून चेन्नईच्या सरकारी इस्पितळात नेण्यात आला. त्याच वेळी राघवन यांचं लक्ष हरिबाबूच्या कॅमेऱ्याकडं गेलं. तो 'शिनॉन'चा कॅमेरा उचलून व्यवस्थित ठेवण्याची सूचना त्यांनी हवालदाराला दिली. सगळे मृतदेह हलवेपर्यंत राघवन जागचे हलले नाहीत. त्यानंतरही बराच काळ केवळ पुरावे नाहीसे होऊ नयेत, यासाठी ते तिथंच थांबले.
शवचिकित्सेनंतर राजीव गांधींचा मृतदेह चेन्नई विमानतळावर नेण्यात आला. त्यांच्या पत्नी सोनिया आणि मुलगी प्रियांका या दोघी दिल्लीहून खास विमानानं नुकत्याच तिथं पोहोचल्या होत्या. जे काही ताब्यात मिळालं, त्यालाच 'राजीव गांधी' मानून त्या २२ मेच्या पहाटे नवी दिल्लीला परतल्या.
तामिळनाडूत तेव्हा राष्ट्रपति-राजवट होती. कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा ठपका ठेवत राज्यातलं करुणानिधी यांचं सरकार चंद्रशेखर सरकारनं बडतर्फ केलं होतं. स्फोट झाल्यानंतर लगेचच राज्यपाल भीष्म नारायण सिंह यांच्या नेतृत्वाखालच्या राज्य प्रशासनानं, ‘या हत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सी.बी.आय.) करावा,' अशी विनंती केली.
पुस्तक : सत्यमेव जयते शोध राजीव - हत्येचा
किंमत - ३०० रुपये
सवलत किंमत - २७० रुपये
पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क
पंकज क्षेमकल्याणी - ९४२२२५२२०८
(माफक दरात, संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात तसेच परदेशात पुस्तकं पाठवण्याची व्यवस्था.)