एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर सर करण्याची अनेकांची इच्छा असते. खरे तर हिला इच्छा म्हणावे की महत्वाकांक्षा असाही प्रश्न आहेच. तर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकालाच हे जमते असे नाही. काही लोक या बर्फातच कायमचे गाडले जातात. ‘ग्रीन बूट’ प्रमाणेच काही लोकांना यशस्वी होऊनही यशाचा आनंद साजरा करण्याची संधी मिळत नाही. एव्हरेस्ट हा आता पूर्वी इतका कौतुकाचा विषय राहिलेला नाही. कारण आतापर्यंत सुमारे ४००० पेक्षा जास्त गिर्यारोहकांनी ७००० पेक्षा जास्त वेळा हे शिखर सर केले आहे. त्यामुळे एव्हरेस्ट सर करणे ही काही नवी महत्वाकांक्षा आहे किंवा नवे आव्हान आहे असे अजिबात नाही.
मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेला हा प्रदेशही आता बऱ्यापैकी प्रदूषित झाला आहे. लोकांनी टाकून दिलेला कचरा, अनावश्यक वस्तू तर आहेतच, पण या पर्वतावर सुमारे २०० हून अधिक मानवी मृतदेह सुद्धा तसेच पडून आहेत. इतक्या प्रमाणात तिथे मृतदेह पडून आहेत तर ते तिथून हटवण्याचे प्रयत्न का केला जात नाही? कारण मृतदेहांना असे बेवारस टाकून कुणीही त्यांचा अपमान करू शकत नाही. हे खरे असले तरी एव्हरेस्टवर ज्यांना मृत्यू येतो त्यांच्या बाबतीत मात्र हे एक दुर्दैवी आणि क्रूर सत्य आहे. यामागची कारणे नेमकी काय आहेत ते जाणून घेऊया या लेखातून.
सध्यातरी एव्हरेस्टवर असे किती मृतदेह पडून आहेत यांचा नेमका आणि अचूक आकडा कुणाला सांगता येणार नसला तरी किमान २०० हून तरी अधिक मृतदेह तिथे असावेत असा अंदाज आहे. गिर्यारोहक आणि त्यांना मार्ग दाखवणारे शेरपा असेच बर्फाखाली, हिमनद्यामध्ये किंवा हिमवृष्टीमध्ये बुजून गेले आहेत. कधी कधी त्यांच्या मृत शरीरावरील बर्फ थोडासा इकडे तिकडे सरकतो आणि त्यांचा एखादा अवयव तेवढा दृष्टीस पडतो. अनेक जण तर अगदी गाढ विश्रांती घेत असल्यासारखे दिसतात. अनेकांचे मृतदेह म्हणजे वाटेवरील मैलाचे दगडच बनले आहेत. जणू ते सांगताहेत तुमचे यश आता इथून फक्त काही अंतर दूर आहे.




