शीर्षक वाचून गोंधळात पडलात ना? कायदेशीर हत्या ही काय भानगड आहे?असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.त्यासाठी संपूर्ण किस्सा वाचा.
'ब्लॅक केस' या नावाने ओळखलं जाणारं हे प्रकरण म्हणजे आरोप, प्रत्यारोप आणि त्यातून निर्माण झालेले कलुषित वातावरण यांची कथा आहे.सत्ता आणि पदाच्या अहंकारामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीला कशाप्रकारे बळीचा बकरा बनवलं जातं याचं हे उदाहरण आहे.
'व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले' अशी ब्रिटिशांची भारतात ओळख आहे.त्यांच्या राज्यकारभाराची सुरुवात एका अर्थाने बंगालमधील प्लासीच्या लढाईने झाली.बक्सरच्या लढाईने त्यांच्या सत्तेवर शिक्कामोर्तब झाला.त्यानंतर त्यांनी कलकत्ता येथे आपल्या भारतातील साम्राज्याची पायाभरणी केली. त्या काळात त्यांना एका जमीनदाराने मोठ्या प्रमाणावर विरोध केला.वॉरन हेस्टिंग्ज या तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नरवर त्या जमीनदाराने भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण त्याच्या या विरोधाचे भलतेच परिणाम त्याला भोगावे लागले. हे प्रकरण त्याला इतके महागात पडले की त्यातून पुढे त्याचा मृत्यू झाला. धूर्त ब्रिटिशांनी त्याला 'राजकीय वध' असे गोंडस नाव दिले तरी हा पद्धतशीरपणे घडवून आणलेला खूनच होता. त्या जमीनदाराचे नाव होते नंदकुमार!





