अत्यंत कंटाळवाण्या अशा लॉकडाऊन नामक कालखंडाचा आपण सर्वांनी सामना केला आहे. त्या दिवसांच्या आठवणीदेखील आज नकोशा वाटतात. एरवी चैतन्याने ओथंबून वाहणारी महानगरं त्या काळात चिडीचूप होती. गावंच्या गावं आजारी असल्यागत वाटत होती. मोकळे निर्जन रस्ते, बंद दुकानं आणि सतत भीतीच्या दडपणाखाली वावरत असलेले चेहरे हे दृश्य आजही त्या काळातल्या कटू आठवणींना उजाळा देतं. इतिहासात अशा प्रकारची टाळेबंदी यापूर्वीही झालेली आहे. उदाहरणच द्यायचं तर अमेरिकेत १९५२ मध्ये ज्यावेळी पोलिओच्या साथीने थैमान घातलं होतं, त्यावेळी अशाच प्रकारचं चित्र दिसत होतं. स्विमिंग पूल बंद होते. सिनेमागृहं, बार हेही मूक होते. गल्लोगल्ली डीडीटीचे फवारे मारले जात होते. हेतू हा की पोलिओचं काही प्रमाणात का होईना उच्चाटन व्हावं. पण प्रत्यक्षात तसं होत नव्हतं. पोलिओची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन काहीतरी करत आहे हे दाखवण्यासाठी हा डीडीटी फवारणीचा उपद्व्याप सुरू होता.
शतकभरापूर्वी पोलिओ हा अत्यंत घातक रोग समजला जायचा. या रोगामुळे रुग्ण मरण पावण्याचं प्रमाणही बऱ्यापैकी होतं. मज्जारज्जूमधील मोटर न्यूरॉन्स वर हल्ला करून पोलिओचा विषाणू माणसाला अपंग करायचा. अनेकदा श्वसनासाठी मदत करणारे स्नायू यामुळे श्वसन करू शकत नसत आणि रुग्णाचा मृत्यू होई.




