रिलायन्सने या महिलेच्या कंपनीत ६०% भागीदारी का विकत घेतली? वाचूया या मागची धोरण

लिस्टिकल
रिलायन्सने या महिलेच्या कंपनीत ६०% भागीदारी का विकत घेतली? वाचूया या मागची धोरण

कोणे एके काळी 'आयते कपडे' - रेडीमेड -कपडे म्हटलं की आई नाकं मुरडायची आणि बाबांच्या कपाळावर आठी उमटायची. आयते कपडे म्हणजे हलक्या दर्जाचे, तर शिंप्याकडून शिवून घेतलेले म्हणजे उत्तम दर्जाचे असा समज होता. नंतरच्या काळात शिंपी महाग झाले आणि रेडीमेड कपडे परवडायला लागले. त्यानंतर 'लेबल' या प्रकाराला महत्व आले. तुम्ही कोणत्या कंपनीचे -कोणत्या फॅशन डिझायनरचे कपडे वापरता यावर सामाजिक प्रतिष्ठेचे मोजमाप व्हायला सुरुवात झाली. मुंबईत तर एकेकाळी 'श्रीमंतासाठी चरागदिन आणि गरीबांसाठी केंब्रिज' असे म्हटले जायचे. ग्लोबलायझेशन झाले आणि युरोप-अमेरिकेतले मोठमोठे ब्रँड भारतात मिळायला सुरुवात झाली. आता तर यापुढची पायरी आपण गाठली आहे आणि अनेक भारतीय फॅशन डिझायनरच्या' लेबल'ला आंतराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.
थोडक्यात, आता कपड्याचा धंदा 'लेबल'वर चालतो! लेबलची किंमत त्याच्या निर्मितीमागे कोण फॅशन डिझायनर आहे यावर ठरते!

गेल्या काही वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचा पसारा अनेक क्षेत्रात वाढलेला आहे. लोकांना माहीतही नाहीत इतक्या गोष्टींमध्ये रिलायन्सची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक आहे. आता तर डिझायनर कपडे आणि फॅशन इंडस्ट्रीतदेखील रिलायन्स कोट्यवधी रुपये ओतून उतरली आहे. एकेकाळी रिलायन्सचे'ओन्ली विमल' हे आम जनतेसाठीचे लेबल होते. ते दिवस आता संपलेत. धीरुभाई अंबानीची 'ओन्ली विमल' कंपनी आता नव्या दिशेने जाते आहे.

धंदा नव्याने उभी करण्याची पध्दत आता बदलली आहे. धागा ते कपडा एकाच छताखाली बनवण्याचे दिवस गेले आहेत. एखादे 'लेबल' बाजारात उभे करण्यापेक्षा एखादे लेबल ताब्यात घेऊन म्हणजे अ‍ॅक्वायर करून रातोरात धंदा मोठा करण्याची स्ट्रॅटेजी सध्या जोरात चालते आहे. अशाच एका सौद्यात मुकेश अंबानींची मुलगी इशा अंबानीने अनामिका खन्ना या महिलेला थेट ६० टक्के पार्टनरशिप देऊन आपल्यासोबत घेतले आहे.

तसे बघायला गेले तर अनामिका खन्ना जगभरातल्या फॅशन इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. स्वतःच्या मेहनत आणि कल्पनाशक्तीच्या जीवावर अनामिका खन्नाने एके-ओके हा ब्रँड जगभर नेला आहे. रिलायन्स आणि अनामिका खन्ना यांनी नुकतेच सोबत काम करण्यास सहमती दर्शवली असून ६०-४० असा हा व्यवहार ठरला आहे.

जुनी भारतीय वेशभूषा आणि आधुनिक पाश्चात्य वेशभूषेचा मिलाफ साधून एके-ओके ब्रँडचे कपडे डिझाइन केले आहेत. या खासियतेसोबत हा ब्रँड आणि वस्त्रांना भारतासकट जगभर मान्यता मिळाली आहे. पन्नास वर्षीय अनामिका फॅशन उद्योगात येण्याआधी शास्त्रीय नृत्यांगना आणि चित्रकार होत्या.
१९९८ साली त्यांनी आपल्या फॅशन करियरला सुरुवात केली. २००४ सालापासून त्यांना खरी भरारी मिळण्यास सुरुवात झाली. त्याचवर्षी त्यांनी लॅक्मे फॅशन वीकच्या फायनलमध्ये आपले कलेक्शन प्रदर्शित केले. नंतर लंडन फॅशन वीक, पॅरिस फॅशन वीक असा प्रवास करत त्यांनी तयार केलेल्या डिजाईन जगभर नावाजल्या जाऊ लागल्या.

श्रीदेवी, माधुरी दीक्षित यांच्यापासून दीपिका पादुकोण, आलिया भट यांच्यापर्यंत अनामिका यांच्या डिझाइनचे कपडे घालण्याचा प्रवास आहे. खन्ना यांनी १० किलो वजनाचा सोने, चांदी, मोत्यांचा समावेश करून तयार केलेला लेहेंगा सिमी ग्रेवाल यांनी लेडी गागाला भेट म्हणून दिला होता.

एके ओके हे नाव कंपनीला देण्यामागील अनामिका खन्ना यांची लाईफस्टोरी आहे. जेव्हा त्यांचा संकटाचा वेळ होता तेव्हा त्या स्वतःला 'एके- ओके' म्हणजेच एके सर्वकाही व्यवस्थित होईल असे सांगत असत.जेव्हा खरोखर त्यांचा चांगला काळ आला तेव्हा त्यांनी हेच नाव कंपनीला देण्याचे ठरविले.

जाता जाता दोन गंमतीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. एक गंमत अशी की या लेबलच्या जमान्यात खरे श्रीमंत 'बीस्पोक' म्हणजे शिंप्याने शिवलेलेच कपडे वापरतात. आणि दुसरी गंमत अशी की जगातील नावाजलेली बरेचशी लेबल्स भारत -श्रीलंका-बांगला देश इथेच तयार होतात. 'लेबल लागलं की किंमत दसपट होते इतकंच काय ते!

आज अनामिका खन्ना यांची ही कहाणी आमच्या वाचकांना सांगण्याचा उद्देश असा आहे की येत्या काळात सर्वच क्षेत्रात नव्या रक्ताला-नव्या विचाराला- नव्या निर्मितीला वाव मिळणार आहे. जे जुने आहे हळूहळू पडद्याआड जाणार आहे. तेव्हा तुमच्यात असे काही खास कौशल्य असेल तर तयार रहा, कदाचित एक दिवस अचानक तुम्हालाही अशीच संधी मिळेल!!

उदय पाटील