बायकोच्या प्रभावाखाली राज्य करणारा त्झार वंशाचा राजा दुसरा निकोलस स्वतःच आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरला!!

लिस्टिकल
बायकोच्या प्रभावाखाली राज्य करणारा त्झार वंशाचा राजा दुसरा निकोलस स्वतःच आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरला!!

जगात शहाणे हाताळायला सोपे, काही प्रमाणात वेडेही; पण अर्धवट माणसांशी व्यवहार करणं, त्यांच्या तावडीत सापडणं महाकठीण. याचाच प्रत्यय त्यावेळी रशियाची जनता घेत होती. याचं कारण होतं त्याकाळी सत्तेवर असलेला त्झारवंशीय दुसरा निकोलस हा रशियन राज्यकर्ता.

दुसरा निकोलस हा त्झार वंशाचा राजा. दिसायला एकदम देखणा. निळ्या डोळ्यांचा, डोळ्यांमध्ये रुबाब, उन्मत्तपणाची झाक असलेला. पण हे सोडलं तर राज्यकारभार करण्यासाठी मात्र तो अजिबात लायक नव्हता. आधीच रशिया एवढा मोठा आणि गुंतागुंतीचा, त्यात या निकोलसकडे धडाडी अशी नव्हतीच. त्याची एकंदर आवड, रुची आणि कर्तबगारी हे सगळंच एखाद्या सर्वसामान्य तरुण रशियन अधिकाऱ्याइतकं साधारण होतं. तो एक निरंकुश सत्ताधारी तर होताच, पण त्याच्या भूमिकेबद्दलचा त्याचा दृष्टिकोनही अतिशय बालिश असा होता. त्याच्या मते त्याला हा अधिकार देवाने बहाल केला होता आणि त्यासाठी तो एकटाच जबाबदार होता.

जोडीला त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचीही कमतरता होती. त्यामुळेच असेल कदाचित, पण त्याच्यावर त्याच्या बायकोचा प्रचंड प्रभाव होता. ज्या गुणांची त्याच्याकडे कमतरता होती, तेच गुण तिच्यात ठासून भरलेले. त्यामुळे त्याच्या निर्णयांमध्येही त्याच्या बायकोचा- अलेक्झांड्राचा- हस्तक्षेप असे. त्यातूनच त्याच्या राजवटीत देव, धर्म, धर्मगुरू यांचं प्राबल्य वाढलं. अलेक्झांड्राच्या मर्जीतल्या माणसांचं फावलं. या राजाने बायकोच्या नादी लागून हाताखालच्या कित्येक कार्यक्षम अधिकाऱ्यांना काढून टाकलं आणि त्यांच्या जागी स्वतःच्या आणि पर्यायाने बायकोच्या मर्जीतले अधिकारी नेमले. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्झार वंशाला आत्तापर्यंत देवत्व बहाल करणारे लोक निकोलसवर नाराज झाले.

त्याला मात्र या सगळ्याशी काही घेणं देणं नव्हतं. उलट त्याने दुसऱ्याच आघाडीवर काम सुरू केलं. पूर्वेकडच्या देशांशी व्यापार-उदीम वाढवून सीमा विस्तार करणं. त्यामुळे पूर्वेकडे पार चीनपर्यंत आणि दुसऱ्या बाजूला पश्चिमेकडील अफगाणिस्तानपर्यंत रशियाच्या सीमा येऊन भिडल्या, पण जपानला मात्र हे काही फारसं रुचलं नाही. कोरियामध्ये रशियाचा प्रभाव वाढवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते, तिथे जपान पाय रोवायला बघत होता. त्यातूनच १९०४-०५ मध्ये जपान आणि रशियामध्ये युद्ध झालं आणि जपानसारख्या छोट्या देशाने रशियाला पराभूत केलं.

'बुडत्याचा पाय खोलात' म्हणतात तसं निकोलसच्या बाबतीत घडलं. त्यात त्याच्या काळात झालेल्या या पराभवामुळे त्याची चांगलीच नाचक्की झाली. यामुळे लोकांच्या असंतोषात आणखीनच भर पडली. पण या युद्धातील पराभवानंतरही त्याचा उद्दामपणा काही कमी होईना. त्याने नागरिकांचे अधिकार काढून घ्यायला सुरुवात केली. परिणामी अनेक ठिकाणी जनता त्याच्या विरोधात एकत्र येऊन आंदोलन करायला लागली. त्यावेळी औद्योगिक क्रांतीमुळे अनेक गुंतवणुकी होत होत्या. त्यापाठोपाठ मोठ-मोठे उद्योग निर्माण होते. अशावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामंजस्य आणि नेमकं हेच निकोलसच्या ठायी नव्हतं. त्याने लोकांच्या विरोधात दडपशाही सत्र सुरू केलं. त्यामुळे रशियातील कामगार एकत्रित होऊ लागले. रशियाची साम्यवादाकडे वाटचाल सुरू झाली. जहाल(बोल्शेविक) आणि मवाळ(मेन्शेविक) असे दोन गट तत्कालीन रशियात निर्माण झाले.

जपान युद्धामुळे अजून एक मोठी घटना रशियात घडली. जानेवारी १९०५ मधील एका रविवारी रशियातील अनेक ठिकाणाहून लोक एकत्र आले. त्यांनी निकोलसच्या विरोधात निदर्शनं केली. यावेळी घटनात्मक राज्य निर्मितीची मागणी केली. ही घटना घडली त्यावेळी निकोलस शहराबाहेर होता. त्यावेळी त्याचा काका ग्रँड ड्युक व्लादिमीर पोलीस सिक्युरिटीचा प्रमुख होता. त्याने जमलेल्या लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. रशियन इतिहासात हा दिवस 'ब्लडी संडे' या नावाने प्रसिद्ध आहे.

जनमत आपल्या विरोधात जात असताना या निकोलसने अजून एक मूर्खपणा केला. पहिल्या महायुद्धात भाग घेतला. एकीकडे रशियावर दारिद्र्याचे ढग जमा झालेले होते, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या दरांनी जनता मेटाकुटीला आली होती. त्यात हे युद्ध. आणि त्यातही रशिया तोंडावर आपटला. आता त्याच्या विरोधातलं वातावरण चांगलंच तापलं.

१९१७ मध्ये परत एकदा कामगार आणि जनता एकत्रितपणे रस्त्यावर उतरले. मात्र यावेळी त्यांच्या पाठीशी रशियन लष्करातले सैनिकही होते. त्यामुळे आपल्या व्यवस्थेला घरघर लागल्याचं निकोलसच्या लक्षात आलं आणि त्याने प्रादेशिक सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून जनतेचा रोष थोडा का होईना; पण कमी होईल. पण त्याच्या या निर्णयाचा जनतेवर काहीच परिणाम झाला नाही. सरतेशेवटी ०२ मार्च या दिवशी तो पायउतार झाला.

इथून पुढे त्याच्या आयुष्याला उतरती कळा लागली. त्यानंतर स्थापन झालेल्या सरकारने निकोलसला अटक केली आणि नजरकैदेत ठेवलं. त्याला स्थाबद्ध करण्यासाठी एका विशेष घराची निर्मिती करण्यात आली. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला रशियातील एका दुसऱ्या शहरात सामान्य जनतेप्रमाणे ठेवण्यात आलं. त्यांची विलासी राहणी काढून घेण्यात आली. त्यांच्यावर अमर्याद निर्बंध घालण्यात आले. त्यांना कोणाशीही बोलण्याची मनाई करण्यात आली. त्याला जिवंत ठेवायचं की नाही, यावरही चर्चा झाल्या.

अखेरीस तो दिवस उजाडला. तारीख होती १७ जुलै १९१८. दुपारी १ च्या दरम्यान त्यांच्या पहाऱ्यावर असलेल्यांपैकी एक त्यांना एका तळघराकडे घेऊन गेला. तिथे आधीच सैन्यातील अनेक बंदूकधारी हजर होते. त्यांच्यातीलच एका माणसाने खिशात असलेला कागद उघडला आणि नाव वाचून तिथेच असलेल्या एका टेबलावर ठेवून दिला. त्यानंतर अचानक गोळीबार सुरू झाला. यात स्वतः निकोलस, त्याची पत्नी अलेक्झांड्रा, त्याची मुलं सर्व जण मारले गेले. त्याचा सगळ्यात लहान मुलगा जिवंत आहे हे लक्षात आल्यावर त्याला प्रथम बंदुकीच्या मागच्या बाजूने आणि नंतर चाकूचे वार करून मारण्यात आलं.

त्या काळात त्याच्याविरुद्धचा असंतोष इतका टोकाला गेला होता, की त्याच्या बाबतीत हे असंच काहीतरी होणार होतं. एका लहरी, उन्मत्त, आणि दूरदृष्टीचा अभाव असलेल्या निरंकुश सत्ताधाऱ्याचा अंत कसा होतो हे इतिहासाने परत एकदा दाखवून दिलं.

स्मिता जोगळेकर