मन म्हटले की आठवते सुधीर मोघ्यांची कविता ,
मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा !
स्वप्नांतिल पदर धुक्याचा
हातास कसा लागावा ?
आपले मन आपलेच असते तरी ते आपल्याला कळत नाही . मनाला काय हवे ते आपल्याला कळत नाही. जे हवे आहे असे वाटते त्याच्या शोधात आयुष्याची फरफट होते. तरी पण आयुष्यभर माणसाची धडपड चालू असते मनःशांती शोधण्यासाठी .कधीतरी आयुष्याच्या भाराने जड जर्जर झालेले मन पुनरुज्जीवीत होईल , हलके फुलके होईल, पुन्हा मनाला नवे पंख फुटतील, या आशेवर मनःशांती शोधण्याचा प्रवास अखंड सुरु राहतो. खरे म्हणजे हे सुख फार दूर नसते पण हाताशी असूनही शोधावे लागते.
नुकतीच एक चित्रमालिका बघण्यात आली. या भौमितीय चित्राची सुरुवात होते एका बिदूने. बिंदू हे पहिले पाउल , दुसरे पाऊल अनेक बिंदूंनी एकत्र येऊन बनलेल्या रेषेचे. मग त्रिमितीचे भान त्रिकोणातून , या अस्तित्वाच्या भानाला काळाची मिती जोडून चौरस तयार होतो. पाच तत्वांची जोड दिली की पंचकोनाची निर्मिती होते, सहावा कोन जोडला की पूर्णत्वाकडे वाटचाल सुरु होते आणि शेवटी अष्टकोन म्हणजे आयुष्याची पूर्णता आणि पुन्हा बिंदूरुप अस्तित्वाकडे परत येणे.
हा इतकाच प्रवास या चित्रात आहे. एक प्रयोग करून बघा. बिंदू ते बिंदू हा प्रवास डोळ्यानी काही काळ बघत रहा. काही वेळाने आपल्या श्वासाची लय चित्रासोबत एकरुप करा आणि बघा मनाला किती शांतात मिळते.

जगातल्या अनेकांनी त्या निरामय शांतीचा अनुभव घेतला आहे . आपण मिळवू या तो आनंद.


