अखेर दोन वर्षांनी या सांबाराला गळ्यात अडकलेल्या चिखल भरल्या टायरमधून मुक्ती मिळालीय.. वाचा त्याची गोष्ट!!

लिस्टिकल
अखेर दोन वर्षांनी या सांबाराला गळ्यात अडकलेल्या चिखल भरल्या टायरमधून मुक्ती मिळालीय.. वाचा त्याची गोष्ट!!

माणसाच्या चुकीमुळे कधीकधी प्राण्यांच्या जीवावर बेतण्याच्या बातम्या वाचल्या ऐकल्या असतीलच. कधी कुठल्या कासवाच्या नाकात स्ट्रॉ जाते, पक्ष्यांचे पाय किंवा माशांच्या गळ्यांना मासेमारीच्या जाळ्यांचा फास बसतो.. एक न दोन!! पण अनेकांना आपण केलेली छोटीशी कृती एखाद्या प्राण्यासाठी किती त्रासदायक ठरू शकते याचा अंदाजच नसतो. आता हेच बघा ना, कोलोरॅडोच्या जंगलात एक लहान सांबराच्या गळ्यात एक चारचाकी वाहनाचे टायर अडकले होते. तब्बल दोन वर्षांनी ते मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी काढण्यात आले. तोवर त्या पिल्लाची किती आबाळ झाली असेल याची कल्पनाही नको. या सांबाराची आणि त्या गळ्यात अडकलेल्या टायरची गोष्ट पाहूयात काय आहे..

वन-अधिकाऱ्यांना २०१९मध्ये पहिल्यांदा हे सांबराचे पिल्लू गळ्यात टायर अडकलेल्या अवस्थेत दिसले होते. त्याला पकडून गळ्यात अडकलेले ते टायर काढणे खूपच गरजेचे होते. नाहीतर त्या सांबराला त्यामुळे इजा होणार हे निश्चित होते. पण,त्याला पकडायचे कसे हा प्रश्न होता. जंगलात ठिकठिकाणी लावलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यांत अनेकदा ते पिल्लू दिसून आले होते. पण त्याला पकडायला जायचा अवकाश, ते तिथून कुठे तरी दूर गेलेले असायचे. दोन वर्षे कोलोरॅडोचे वन-अधिकारी त्या सांबरावर लक्ष ठेवून होते, पण ते पिल्लू काही केल्या हाताशी लागत नव्हते.

सुदैवाने ९ ऑक्टोबर २०२१ रोजी त्याला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यातून ते टायर काढण्यात सिपीडब्ल्युच्या वन-अधिकाऱ्यांना यश मिळाले. दोन वर्षांत त्या टायरमध्ये चिखल साठून साठून ते टायर काढायला कठीण बनले होते. शिवाय चिखल साचून राहिल्याने त्याचे वजन अजूनच वाढले होते. कोलोरॅडोच्या वन-अधिकाऱ्यांनी जेव्हा त्या टायरचे वजन केले तेव्हा ते तब्बल ३२ पौंड इतके भरले. वाईट गोष्ट एवढीच की टायर पटकन कापता न आपल्याने वन-अधिकाऱ्यांना त्या सांबराची शिंगे कापावी लागली.

त्या दिवशी ते सांबर आपल्या काळपातील इतर सांबरांसोबत पाईन जंक्शनपासून एक मैल अंतरावर असणाऱ्या एका मैदानात चरत होते. या जमिनीचा मालक आपल्या कामात व्यस्त होता इतक्यात त्याला त्याच्या बायकोने आपल्या जमिनीवर सांबरांचा एक कळप आला असल्याचे दाखवले. ४० सांबरांच्या त्या कळपात त्याला टायर गळ्यात अडकलेले ते सांबर दिसले. वन-अधिकारी दोन वर्षापासून या सांबराला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत हे त्याला माहीत होते, म्हणून त्याने सिपीडब्ल्युच्या अधिकाऱ्यांना फोन केला.

त्या सांबराबद्दल माहिती मिळतातच कोलोरॅडोचे स्वॅसन आणि डॉसन हे वन-अधिकारी ताबडतोब त्याठिकाणी पोहोचले आणि त्या सांबराला आधी त्यांनी बेशुद्ध केले. त्याच्या गळ्यातून टायर काढण्यासाठी टायर कापणे आवश्यक होते. कारण सांबराची शिंगे आता मोठी झाली होती आणि त्यांना फाटे फुटले होते. त्यामुळे ते टायर तसे शिंगातून काढताच आले नसते. टायर कापण्याच्या प्रयत्नात त्यांची करवतच तुटून गेली. दोन वर्षात तो टायर खूपच कठीण झाला होता. त्याच्या आत अगदी काठोकाठ चिखल साठला होता. तो वरुन काढणे शक्य नव्हते आणि कापून काढणेही शक्य नव्हते. त्यामुळे स्वॅसन आणि डॉसन यां दोन अधिकाऱ्यांनी सांबराची शिंगे कापून मग ते टायर काढण्याचा निर्णय घेतला. सांबराला जाग येण्याआधी त्यांना त्यांचे काम आटोपून घ्यावे लावणार होते. मग काय सांबराची शिंगे कापली आणि टायर त्याच्या गळ्यातून काढण्यात आले.

शेवटी त्या सांबराला त्या टायरच्या ओझ्यातून तरी मुक्ती मिळाली. गेली दोन वर्षे टायर कायमचेच गळ्यात अडकून राहिल्याने त्याच्या गळ्याभोवती व्रण पडले होते. थोडेसे खरचटून गळ्याभोवती जखमा झाल्या होत्या. त्या सगळ्या त्रासातून सांबराला मुक्ती मिळाली हेच महत्वाचं. तसेही एल्क जातीच्या या सांबारांत शिंगांची पुन्हा-पुन्हा वाढ होत राहते. सांबर वयात आल्यानंतर मादी सांबरावर हक्क सांगण्यासाठी जेव्हा दोन नर सांबरांची जुंपते तेव्हा या शिंगाच्या मदतीनेच नर सांबर लढाई करतात. या लढाईत जो जिंकेल त्याचा मादीवर हक्क, असा त्यांचा नियम असतो.

पुढच्या वर्षात त्याला पुन्हा शिंगे फुटतीलच त्यामुळे सांबरांचा हा मिलन काळ जारी वाया गेला असला तरी त्याच्या गळ्यातील एक मोठं लोढणं नाहीसं झालं आहे. स्वॅसन आणि डॉसन या अधिकाऱ्यांनी दोन वर्षे पाठलाग केल्यानंतर अखेर यावर्षी त्या सांबराच्या गळ्यातील तो टायर काढण्यात यश आले आहे.

अडचणीत सापडलेल्या प्राण्यांना मदत करून त्यांना नवे जीवन देणाऱ्या या वन-अधिकाऱ्यांचे कौतुक करावे तितके थोडेच. त्या दोघांचे एकच मत आहे, आपल्यासाठी निरुपयोगी ठरलेली कोणतीही गोष्ट मोकळ्यावर फेकतान किमान त्यामुळे कुणाचे नुकसान तर होणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे आणि अशा निरुपयोगी वस्तूंची योग्य ती विल्हेवाट लावता आली पाहिजे. आपल्या गाफीलपणाची आणि हलगर्जीपणाची शिक्षा या बिचाऱ्या मुक्या जीवांना नको.

त्यांचे म्हणणे बरोबरच आहे. हो ना?

मेघश्री श्रेष्ठी