गेली कित्येक दशके मराठवाड्याला टॅंकरवाडा म्हणून ओळखलं जात आहे. पाण्यावरतीच शेती अवलंबून असल्याने शेतकरी हताश होऊन आत्महत्या करत आहेत. दुष्काळाने मराठवाड्याचा कणाच मोडून टाकलाय. यावर्षी तर पश्चिम महाराष्ट्रातून रेल्वेने पाणी आयात करण्याची वेळ मराठवाड्यावर आली आहे. महिन्यातून एकदा पाणी येण्याचे दु:ख किमान एकदा सहन केल्याशिवाय त्यातलं गांभीर्य कळायचं नाही.
दरवर्षी ही परिस्थिती अधिकच चिघळत चाललीय. नासाच्या लॅंडसॅट-८ उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांचं ’मॅपबॉक्स’च्या मदतीने परिक्षण करताना मराठवाडा कसा होरपळतोय हे कळून येतं. आणि हे परीक्षण फक्त गेल्या वर्षी १ एप्रिल २०१५ आणि यावर्षी ३ एप्रिल २०१६ या दिवशी घेतल्या गेलेल्या फोटोजचं आहे. एका वर्षात इतका फरक पडला असेल तर आणखी काही वर्षांत काय संकट ओढवेल याची कल्पनाच करता येत नाहीय.



