पोलिसांना गुंगारा देत त्याने १०० मुलांवर लैंगिक अत्याचार, हत्या आणि त्यांच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे तुकडे करून जाळले. पोलीस त्याचा मागोवा घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते, पण अखेरीस जावेदनेच स्वतःच गुन्हा कबूल करायचे ठरवले. तशा आशयाचे एक पत्र त्याने पोलिसांना आणि स्थानिक वर्तमानपत्रांना पाठवले. त्यात त्याने केलेल्या सहा ते सोळा वयोगटातील शंभर मुलांचा बलात्कार आणि खून याचा उल्लेख होता. या मुलांचा खून कसा केला याबद्दलही त्याने लिहिले होते. आधी अपहरण, बलात्कार, मुलांच्या शरीराचे केलेले लहान लहान तुकडे आणि त्यावर केलेला ऍसिडचा मारा या सगळ्या गोष्टी होत्या. त्याने हे सुद्धा कबूल केले की रावी नदीत बुडून आत्महत्या करण्याचाही त्याने प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न असफल ठरला.
पोलिसांनी लगेच त्याच्या घरावर छापा घातला. तिथे गेल्यावर सर्व घरात रक्ताचे डाग सापडले. फरशी आणि भिंती रक्ताने माखून गेल्या होत्या. मुलांना गळा आवळण्यासाठी वापरलेली चैन तिथे होती. मारलेल्या सर्व मुलांचे फोटो आणि त्यांची नावे व्यवस्थित लेबल करून ठेवलेली सापडली. डिसेंबर १९९९ साली तो स्वतःहून एका वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये हजर झाला. तिथे आल्यावर तो म्हणाला, "मी जावेद इक्बाल, १०० मुलांचा खुनी. मी केलेल्या कृत्याची मला अजिबात लाज वाटत नाही. मी मरायला पण तयार आहे, कारण मला या पूर्ण जगाची चीड येते. मी पैशांसाठी हे सगळं केले नाही. मी कदाचित ५०० मुलांनाही मारू शकलो असतो, परंतु मी शंभर मुलांना मारण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून मी फक्त तेवढ्याच मुलांचा जीव घेतला. मला या गोष्टीचा अजिबात पश्चात्ताप होत नाही." त्याची सर्वत्र वाच्यता व्हावी म्हणून तो वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये गेला.
पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने असे का केले हे विचारले असता त्याने जे कारण सांगितले ते अजून धक्कादायक होते. त्याने सांगितले हे घृणास्पद कृत्य म्हणजे त्याला पोलिसांकडूनच भूतकाळात मिळालेल्या क्रूर वागणूकीचा बदला होता. १९९० मध्ये जेव्हा तो विशीत होता तेव्हा एका तरुण मुलाच्या बलात्काराची केस त्याच्यावर होती. तो खोटा आरोप असूनही लाहोर पोलिसांनी त्याला अटक केली . त्याच्या आईने त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते, पण ते शक्य झाले नाही आणि त्या धक्क्यातच ती हृदय विकाराच्या झटक्याने जग सोडून गेली. काही काळाने इक्बाल सुटला, पण मनात पोलिसांविषयी प्रचंड राग होता. त्यांच्यामुळेच त्याची आई गेली म्हणून बदला घेण्यासाठी हे क्रौर्य करायचे ठरवले.
जावेद इक्बालला कोर्टातून शिक्षा मिळाली. मुलांना ज्याप्रकारे मारले तसेच त्यालाही मारण्यात यावे असे न्यायाधीशांनी सुनावले. परंतु शिक्षा होण्यापूर्वीच आठ ऑक्टोबर २००१ मध्ये इक्बालने जेलमध्ये बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली. संपूर्ण पाकिस्तानला हादरवून टाकणारे हत्याकांड बराच काळ चर्चेत राहिले.
शीतल दरंदळे