संपन्न सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आपल्या या भारत देशात कितीतरी आश्चर्यकारक आणि रहस्यमय ठिकाणे आहेत. नद्यांचाही आपल्या देशाला समृद्ध वारसा आहे. इथली प्रत्येक नदी अप्रतिम सौंदर्याने नटलेली असून प्रत्येकीचा एक आगळावेगळा इतिहास आहे. झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडीसामधून वाहणारी आणि पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणारी सुवर्णरेखा नदीही अशीच एका वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. या नदीच्या पाण्यात सोने सापडत असल्याची वंदता आहे, जाणून घेऊया या नदीची ही आगळीवेगळी कहाणी.
या नदीचा उगम झारखंडची होतो राजधानी रांचीपासून १५ किमी अंतरावर असणाऱ्या पिस्का/नगदी या गावातून. पावसाळ्यात या नदीच्या पत्रात उतरणे शक्य नसले तरी हिवाळ्यापासून मात्र लोकं या पात्रातील सोन्याचे कण गोळा करण्याच्या कामात व्यस्त होतात. या नदीकाठच्या वाळूतही सोन्याचे कण आढळून येतात. तांदळाच्या दाण्याहूनही बारीक असलेले हे कण शोधणे म्हणजे काही खायचे काम नाही. सरंदा आणि तामर परिसरात राहणारे लोक नदीतील हे सोन्याचे कण वेचण्याचे काम करतात. संपूर्ण दिवस घालवल्यानंतर फार तर ६० ते ७० मिलीग्रॅम इतके सोने त्यांना सापडते. कधी कधी तर तेही सापडत नाही. महिनाकाठी पाच-सहा हजारांची कमाई होईल इतके सोने तर इथे प्रत्येकाला मिळते.

