उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळल्या जाणाऱ्या पेटंट बैठ्या खेळांपैकी एक म्हणजे बुद्धिबळ! ६४ घरांच्या ह्या खेळात राजा, हत्ती, घोडा ह्या सगळ्यांची रूपं वेगळी, चाली वेगळ्या! तरीही कोणत्याही नवशिक्या खेळाडूच्या मनात एका मोहऱ्याबद्दल कुतूहल असतंच: तो म्हणजे उंट! त्याचं कारण म्हणजे उंटाच्या डोक्यावर असलेली खाच! ह्या खाचेमागचं कोडं उलगडणारा हा लेख…
हे कोडं सोडवण्यासाठी आपण जरा मागे जाऊया. बुद्धिबळाचा उगम जरी भारतात झाला असला, तरी त्याला आज असलेलं स्वरूप मिळण्यासाठी खूप वर्षं जावी लागली. ह्या खेळाचं मूळ रूप म्हणजे चतुरंग! हा खेळ दोनऐवजी चारजणांमध्ये खेळला जाई. प्रत्येक खेळाडूकडे राजा आणि चार सैन्यदलं असत. आता प्राचीन भारतामध्ये युद्धात नेहमी पायदळ (Infantry), घोडदळ (Cavalry), रथदल (Chariots) आणि गजदल (Elephantry) ही चार सैन्यदलं वापरली जात. त्यामुळे हेच सैन्य पटावरही उभं राहिलं. राजा, प्यादी आणि घोडे ह्यांच्या चाली आजच्या बुद्धिबळाप्रमाणेच होत्या. पण रथ मात्र आजच्या बुद्धिबळातल्या हत्तीप्रमाणे चालत, आणि हत्ती मात्र आजच्या बुद्धिबळातल्या उंटाप्रमाणे!!






