दर पावसाळ्यात एक दिवस असा असतो, ज्यात मुंबईमध्ये दणकून पाऊस पडतो, ट्रेन बंद पडतात, जागोजागी पाणी साचायला लागतं आणि मग मुंबईकरांना आपला जीव वाचवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. सरकार दरवर्षी पावसाच्या तयारीचा दावा करते, पण बहुदा काही गोष्टी कधीच बदलणार नाहीत.
या वर्षी या सगळ्याची पुर्नउजळणी २९ऑगस्टला पाहायला मिळाली. नऊ किलोमीटरच्या ढगांच्या कृपेने सकाळपासून काही तासांत २०० ते ३०० मीमी पाऊस पडला आणि मुंबईचे ये रे माझ्या मागल्या सुरू झाले. या सगळया मागची कारणमीमांसा करायची झाल्यास सरकारच्या ड्रेनेज सिस्टम सुधारण्याच्या अपयशापासून ते आपल्या सतत घडणाऱ्या विकासाने निसर्गाची लावलेली वाट अशी अनेक कारणं आहेत.








