दुसऱ्या महायुद्धात भारतात कोसळलेले विमान ७७ वर्षांनंतर सापडले. ते का शोधले आणि शोधकार्य अवघड का होते?

लिस्टिकल
दुसऱ्या महायुद्धात भारतात कोसळलेले विमान ७७ वर्षांनंतर सापडले. ते का शोधले आणि शोधकार्य अवघड का होते?

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीन ते म्यानमार या भागात अनेक लढाऊ विमाने कोसळली होती. जपानी फौजांविरुद्ध लढताना ही अमेरिकन विमाने भारतातील हिमालयावरून जात असताना वादळी वारे, हिमवर्षाव अशा कारणांनी खराब होत आणि ती या भागात कोसळत. याच काळात हिमालयीन भागात पडलेले एक विमान तब्बल ७७ वर्षांनी शोधण्यात यश आले. हे विमान शोधण्यासाठी एक स्वतंत्र मोहीम सुरु होती. हे शोधकार्य सुरू असताना ३ गाईड मृत्युमुखी पडले. यावरून या शोधमोहिमेतली जोखीम लक्षात येऊ शकते.

१९४५ साली जानेवारीत हिमालयातील अरुणाचल प्रदेश भागात हे विमान पडले होते. विमान C - ४६ प्रकारातले लढाऊ विमान होते. चीनमधील कँमिंग भागातून हे C - ४६ विमान १३ लोकांना घेऊन जात असताना पडले. या अपघातात कोणीही वाचू शकले नव्हते. अपघात झाल्यावर कोणी सापडणे तर सोडाच, पण विमानाचे अवशेषही सापडले नव्हते. आता इतकी वर्षं लोटल्यावर ते विमान सापडले. या विमानात असलेल्या एका अधिकाऱ्याचा मुलगा बिल शेरर यांनी क्लेटन कुहल्स हा अमेरिकी धाडसी ट्रेकरला हे विमान शोधण्याचे काम सोपवले होते.

या शोधमोहिमेला कित्येक महिने लागले आहेत. कुहल्स आणि त्यांच्या टीमने स्थानिक लोकांना आणि गाईड्सना सोबत घेऊन छातीपर्यंत खोल पाणी असलेल्या नदीपात्रांतून आणि उंचावरच्या अंग गोठवणाऱ्या थंडीत जंग जंग पछाडून या विमानाचा शोध घेतला आहे. इतकेच नाही, तर जेव्हा मोहिमेच्या सुरवातीच्या काळातच सप्टेंबरमध्ये जबरदस्त बर्फ पडत होता आणि तेव्हाच ३ गाईड हायपोथर्मिया म्हणजेच शरीराचे तापमान अतिशय कमी होऊन मृत्युमुखी पडले. अखेर एका पर्वतशिखरावर विमानाचे काही अवशेष सापडले. शेपटीवरच्या क्रमांकावरुन हे तेच विमान आहे हे निश्चित झाले आणि मोहिम सफल झाली.

बिल शेरर सांगतो की, "आपले वडील वारले ही गोष्ट कितीही दुःखद असली तरी आपण खुश आहोत. कारण आता सत्य मला माहित झाले आहे. मी लहान असताना माझे वडील हरवले आहेत, एवढेच पत्रं माझ्या आईला मिळत असत." त्यावेळी बिल फक्त १३ महिन्यांचा होता. वडिल गायब असण्यापेक्षा ते वारले आहेत हे मनाला अधिक शांतीदायक आहे असे त्यांच्या मुलाला वाटते.

बिल शेररने इतक्या वर्षांनी का होईना पण आपल्या वडिलांसोबत नेमके काय झाले याचा छडा लावल्याने त्याच्या मनावरील मोठे ओझे दूर झाले आहे.

उदय पाटील