पहिल्या महायुद्धात दोन्ही बाजूच्या सैनिकांनीच लागू केलेली आगळीवेगळी युद्धबंदी!!

लिस्टिकल
पहिल्या महायुद्धात दोन्ही बाजूच्या सैनिकांनीच लागू केलेली आगळीवेगळी युद्धबंदी!!

युद्धभूमीवर अचानक दोन्हीकडचे सैनिक आपापली हत्यारे टाकून गाणी गाऊ लागले, आपसांत गप्पा मारू लागले, खेळू लागले, तर..??
तर काय, कल्पनाच हो! किती केलं तरी असलं काही प्रत्यक्षात कुठे घडणार आहे का? असा विचार तुमच्या मनात आला तर त्यात काही नवल नाही सोडा. पण तुम्हाला माहितीये का? पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मन आणि इंग्लंडच्या सैन्याने ही कल्पना सत्यात उतरवली होती. आता हे वाचून थोडे आश्चर्य वाटेल. कारण ज्या महायुद्धाने जगाला हिंसेचा, क्रौर्यचा अमानुषतेचा नंगानाच दाखवला त्या महायुद्धात अशी काही सुखद घटना घडली असेल यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही, पण प्रत्यक्षात हे घडले होते.

१९१४ साली पहिल्या महायुद्धाला नुकतीच सुरुवात झाली होती. या युद्धाने आधीच लाखो बळी घेतले होते. रक्ताचे पाट वाहिले होते. कित्येक संसार उध्वस्त झाले होते, सगळीकडचा हाहा:कार पाहून लोकांचा जगण्यावरचा विश्वास उडाला होता, अशात घडलेल्या त्या एक घटनेने ही दाखवून दिले की सत्तालोलुप साम्राज्यवाद्यांनी कितीही अशांतता पसरवली तरी मुळात शांती हीच मनुष्याची मूलभूत गरज होती, आहे आणि राहिल.

काय होती ती घटना? ती घटना होती युद्ध सुरू झाल्यानंतर आलेला पहिला ख्रिसमस आणि त्यानिमित्ताने जर्मन आणि ब्रिटिश सैन्याने स्वतःहून लागू केलेला ख्रिसमस ट्रूस. शांतता प्रिय आणि प्रेमाची महती गाणाऱ्या येशूची जयंती. त्या दिवशी कुणाला बरे रक्तपात करावा वाटेल? सैनिक जरी घरच्यांसोबत ख्रिसमस साजरा करू शकत नसले तरी एकमेकांसोबत काय, पण ते शत्रूसोबतही ख्रिसमस साजरा करण्यास तयार होते आणि त्यांनी तो केलासुद्धा.
त्या ख्रिसमसच्या आदल्या रात्री ब्रिटिश सैन्याचे कॅप्टन आर्थर ओ’सुलीवन यांची फ्रांसमधल्या रह्यू दी बॉइस येथे छावणी पडली होती. शत्रू दलाच्या छावणीतून त्यांना एक आवाज एकू आला, “रात्री १२ नंतर, गोळीबार करू नका, आम्हीही करणार नाही. तुम्ही बाहेर येऊन आमच्याशी थोडं बोला. आम्ही हल्ला करणार नाही, विश्वास ठेवा.”

या आवाजावर विश्वास ठेवून एक आयरीश सैनिक आपल्या तंबूतून बाहेर आला आणि जर्मनी छावण्यांच्या दिशेने चालू लागला. गेलेल्या सैनिकाचे नेमके काय होणार सुखरूप परत येणार की दगाबाजीने मारला जाणार या चिंतेत असलेल्या ब्रिटिश सैन्याने लवकरच सुटकेचा निश्वास सोडला. कारण गेलेला सैनिक सुखरूप परत तर आला होताच, पण त्याच्या हातात भेट म्हणून मिळालेली जर्मन सिगार देखील होती. मग हळूहळू एकेक सैनिक बाहेर येऊन युद्धबंदी क्षेत्रात जमा होऊ लागले. दोन्हीकडच्या सैनिकांनी एकमेकांची गळा भेट घेतली आणि एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छादेखील दिल्या.

अशाप्रकारे पहिल्या महायुद्धातिल अनधिकृत युद्ध बंदी सुरू झाली होती. याला नंतर ख्रिसमस ट्रूस म्हटले गेले. पोप बेनेडिक्ट-पंधरावे यांनी आदल्याच महिन्यात दोन्ही देशांना ख्रिसमसच्या निमित्ताने युद्धबंदी जाहीर करण्याचे सुचवले होते, मात्र दोन्हीकडील अधिकाऱ्यांनी पोपच्या या विनंतीला भीक घातली नव्हती. शेवटी अधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट न पाहता सैनिकांनीच स्वतःहून युद्धबंदी लागू केली.

या काळात दोन्हीकडील सैनिकांनी त्यांच्या त्यांच्या शाहिद झालेल्या सैनिकांच्या मृतदेहांचे रीतसर दफन केले. मग एकमेकांशी गप्पा मारल्या. मद्यपान, खान-पान तर केलेच. प्रार्थना गायल्या आणि फुटबॉलचाही आनंद लुटला. ख्रिसमस ट्रूसच्या त्या कालावधीत ही सैनिक आपसातील शत्रुत्व पूर्णतः विसरून गेले होते.

सैनिकांनी अशाप्रकारे स्वतःतील शत्रूभाव मिटवला असला तरी अधिकऱ्यांना काही ही शांतता पचनी पडत नव्हती. १९१५च्या जानेवारीपर्यंत तरी या ठिकाणी शांतताच दिसत होती, मात्र अधिकाऱ्यांना युद्ध हवे होते आणि त्यांनी सैनिकांनी स्वीकारलेली ही युद्धबंदी रद्द करून टाकली. पुढे कधीही अशाप्रकारची युद्धबंदी सैनिक करणार नाहीत आणि ती स्वीकारली जाणार नाही याचीही अधिकाऱ्यांनी तजवीज करून ठेवली.

आज अशी युद्धबंदी प्रत्यक्षात अंमलात आली तर काय होईल? तुमचे उत्तर कमेंट करून नक्की सांगा.

मेघश्री श्रेष्ठी