भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात या आरोळीला महत्वाचं स्थान आहे. रॅंड नावाच्या जुलूमी इंग्रज अधिकारी येत असल्याची खुणेची आरोळी होती ती. या रॅंडने पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या निराकरणाच्या नावाखाली जनतेवर जुलूम केला, स्त्रियांची विटंबना केली आणि त्याचा बदला म्हणून दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या तिघा चापेकर बंधूंनी या रॅंडला आजच्याच दिवशी म्हणजे २२जून १८९७साली गोळ्या घातल्या.
ब्रिटिश अधिकार्यांनी भारतीय जनतेचा अंत पाहिला आणि रागाच्या उद्रेकाला ते कारणीभूतही ठरले. रॅंड त्याच दिवशी न मरता ससून रूग्णालयात जुलैला वारला. फंदफितुरीमुळे चापेकर बंधूही इंग्र्जांच्या हाती लागले आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली. त्यांना मदत करणार्या एका शाळकरी मुलाला देखील दहा वर्षे सक्तमजुरीची सजा झाली.

" आम्ही ज्यावेळी भयंकर कृत्यास हात घालीत होतो. त्यावेळी भावी स्थिती मनात येत नसे असे नाही. पण त्याची पर्वा करीत नव्हतो व आताही आम्ही करीत नाही. लग्न समारंभात निघालेल्या मिरवणुकीपेक्षा आम्ही या अंतकालच्या मिरवणुकीस जास्त महत्व देतो."
- हुतात्मा दामोदर हरि चापेकर
(वडिलांना लिहिलेले पत्र - दि.१२/१०/१९९७, २२ जून १८९७ मधून साभार)या घटनेवर आलेला जयू आणि नचिकेत पटवर्धन यांनी ’२२ जून १८९७’ नावाचा सिनेमा प्रसिद्ध आहेच. नुकताच गिरिवा प्रॉडक्शन्सनेही याच घटनेवर एक नवीन सिनेमाची घोषणा केली आहे.

