त्या जहाजावरील दर्यावर्दी हवालदिल झाले होते. कारणही तसंच होतं. वाचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे अशा ठिकाणी ते अडकून पडले होते. इथून आपण जिवंत, सुखरूप बाहेर पडू की नाही हेही त्यांना ठाऊक नव्हतं. अपेक्षेने ते त्यांच्या नायकाकडे बघत होते. पण सुटकेचा मार्ग दिसत नव्हता. दिवसेंदिवस संकट अधिकच गहिरं होत चाललं होतं.
१९१४ ते १७ या कालखंडामध्ये इम्पीरियल ट्रान्स-अंटार्क्टिका एक्सपेडिशन नावाची मोहीम राबवण्यात आली. अत्यंत साहसी, अविश्वसनीय आणि थरारक अशी मोहीम होती ही. अंटार्क्टिका खंडाच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत प्रवास करणं हा या तिचा हेतू होता. मोहिमेचा मार्ग दक्षिण ध्रुवावरून जाणार होता. पण प्रत्यक्षात घडलं ते विपरीतच.







