दर पंधरा ऑगस्टला टीव्हीवर दाखवले जाणारे सिनेमे; यातले किती सिनेमे तुम्ही पाहिलेयत?

लिस्टिकल
दर पंधरा ऑगस्टला टीव्हीवर दाखवले जाणारे सिनेमे; यातले  किती सिनेमे तुम्ही पाहिलेयत?

आजकाल आपल्याकडे केबलमुळे चॅनेल्सचा सुकाळ तर झालाच आहे, पण यूट्यूब आणि इंटरनेटमुळे एखादं गाणं किंवा सिनेमा पाहाण्यासाठी टीव्हीवर अवलंबून राहावं लागत नाही. पण दूरदर्शनच्या जमान्यात तर चित्रहार, छायागीत  आणि चित्रगीतमध्ये कोणती गाणी लागतील याचेही अंदाज करता यायचे. कधीकाळी जाहिरातींसह खच्चून अर्धातास चालणार्‍या कार्यक्रमात  लागणारे चार-पाच गाण्यांचे  व्हिडिओज पाहायला एवढी मरमर करायचो हे आठवून आता हसायला येतं.  पण राष्ट्रीय सणांच्या दिवशीचा ससेमिरा अजून सुटला नाहीय. तेव्हाही आणि आताही यातले कुठले ना कुठले पिक्चर लागतातच.

अगदी सक्कासक्काळीच हकीकत्मधलं  ’कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियों’ कानावर पडे आणि त्या आठवड्यातल्या शनिवारी किंवा रविवारी तो चित्रपट हमखास पाहायला मिळे. झालंच तर ’आओ बच्चों तुम्हें दिखायें झॉंकी हिदुस्तानकी’ हे गाणं  आणि सोबत ’जागृती’,  ’वंदे मातरम’ हे गाणं असलेलाआनंदमठ हे सिनेमे तर पक्के ठरलेले असत. जर हे सिनेमे नसतील तर आपला ’भारतकुमार’ मनोज कुमारकडे अशा दिवशी दाखवण्यासाठीच्या सिनेमांची यादीच तयार होती. उपकार आणि क्रांती तर एकेकाळी दूरदर्शनचे ऑल टाईम फेव्हरिट होते. 

ही झाली ९०च्या दशकातली गोष्ट. आज पाहूयात सध्याच्या युगात टीव्हीवर कोणते सिनेमे लागतात ते..  

गांधी

गांधी

परदेशी मालिकांमध्येही महात्मा गांधीचं नांव आदरानं घेतलं जातं. त्यांच्या आयुष्यावरती निघालेला ’गांधी’ हा एक उत्कृष्ट सिनेमा. इतका उत्कृष्ट की आता विष्णूपंत पागनीसांसारखे रिचर्ड ऍटनबरोसुद्धा गांधी म्हणून सगळीकडे खपतात.

क्रांतीवीर

हा सिनेमा तसा काही देशभक्तीपर नव्हता, पण ’हिंदूका खून-मुसलमानका खून’ या नाना पाटेकरच्या डायलॉगमुळे हा सिनेमाही देशभक्तीपर पिक्चर्सच्या यादीत जाऊन बसलाय.

प्रहार - द फायनल ऍटॅक

’प्रहार’हा कमर्शिअली न चाललेला पण ’क्लासिक’ समजला गेलेला सिनेमा. नाना पाटेकरची मेजर प्रताप चौहानच्या भूमिकेची फार वाहवा झाली. ’तुम्हारी ही मुठ्ठीमें आकाश सारा...’ हे गाणं या सिनेमाचा चरमबिंदू होता.

तिरंगा

तिरंगा

अचाट आणि अतर्क्य घटनांनी भरलेला हा चित्रपट इतक्यावेळा चॅनेल्सनी आपल्या माथी मारलाय की बोलायची सोय नाही. पण  एकदा का सिनेमा पाहायला लागतात, की मात्र दर सीनमागे जी मजा येते त्याला तोड नाही. 

सरफरोश

सरफरोश

सरफरोश हा एक भारी सिनेमा होता.  आमिर खान , नसीरूद्दिन शाह, मुकेश ऋषी आणि अखिलेंद्र मिश्रा(मिरची सेठ) यांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि ’डोन्ट माईंड’ म्हणत बागडणारी सोनाली बेंद्रे. या सिनेमातली गाणीही एकापेक्षा एक प्रेरणादायी होती. ’होशवालों को खबर क्या.. ’ तर तोडच नाही.

द लीजंड ऑफ भगत सिंग

द लीजंड ऑफ भगत सिंग

त्या वर्षी भगतसिंगांवरच्या पिक्चर्सचं अगदी पेव फुटलं होतं. त्या तिन्ही सिनेमांमधला हा सर्वात सुंदर चित्रपट होता. 

 रंग दे बसंती

रंग दे बसंती

हा सिनेमा कथा, मांडणी, संगीत या सगळ्याच निकषांवर सुंदर होता. कॅप्टन अभिजीत गाडगीळ यांच्या मृत्यूवर आधारित घटना, मैत्री, राजकारण, युवावर्ग या सगळ्या गोष्टी ’आरडीबी’मध्ये सुंदररित्या चित्रित केल्या होत्या. 

लगान

लगान

भुवन,  त्याची क्रिकेट टीम, गौरी आणि एलिझाबेथ!! चंपारण आणि ’डुगना लगान’ सुपरडुपर हिट झालेला सिनेमा!!

स्वदेस

स्वदेस

’नासा’मधून मायदेशी  परतलेल्या या इंजिनिअरची कहाणी पाहायला कुणाला आवडत नाही?

बॉर्डर

बॉर्डर

मल्टीस्टारकास्ट, देशभक्ती, प्रेमकथा या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे बॉर्डर. हा ही सिनेमा संगीत, कथा, संवाद या सर्व गोष्टींमध्ये बेस्ट होता.

 

तर मंडळी, सर्वच सिनेमे आम्ही या यादीत टाकू शकलो नाहीय. तर आमच्याकडून या यादीत कोणते सिनेमे राहिले हे कमेंट्समध्ये आम्हाला जरूर कळवा.