राजघराण्याचा वारस चालवण्यासाठी तरी मुलगा हवाच, या समजाला धक्का देत १७ व्या शतकात राणी ॲना नेझींगाने वडिलांनंतर सत्ता आपल्या हातात घेतली. फक्त सत्ता घेऊन ती स्वस्थ बसली नाही, तर आफ्रिकन लोकांचा व्यापार करणाऱ्या पोर्तुगीजांना तिने कायम आपल्या धाकात राहण्यास भाग पाडले. आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून विकण्यास तिचा सख्त विरोध होता. कधी चर्चेच्या मार्गाने तर कधी युद्धाने तिने पोर्तुगीजांना ‘हम किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले.
अगदी आजही वंशाचा दिवा किंवा वारसदार म्हणून मुलाकडेच पाहिले जाते. पण सतराव्या शतकात राणी ॲना नेझींगाने राजगादीवर आपला हक्क सांगून मोठी आपत्तीच ओढवून घेतली होती. यासाठी काही काळ तिला राज्यापासून दूर व्हावे लागले. सगळ्या आपत्ती झेलूनही राणी ॲना राजसत्ता मिळवण्यात यशस्वी ठरली. यासाठी साम, दाम, दंड, भेद असे सगळे पर्याय तिने वापरले, पण आपला हक्क सोडला नाही. पराक्रमासोबतच राजकर्त्यांकडे कुटिलता आणि चातुर्यही असावे लागते, तेही राणी नेझींगामध्ये अगदी कुटूनकुटून भरले होते. राणी नेझींगाची ही कथा तुम्हाला जितकी प्रभावी तितकीच किळसवाणीही वाटेल. का ते पुढे वाचा.
नेझींगाचा जन्म १५८३च्या सुमारास झाला. निगोला किलौंजी सांबा आणि मबुंदू राणीचा शाही वारसा मिळालेली ही राजकन्या तशी लहानपणापासूनच चाणाक्ष होती. तिच्या इतर बहिणी आणि भावापासून तिला वेगळे ठरवणारे काही गुण उपजतच मिळाले होते. शिवाय, वडिलांचे अतोनात प्रेम होतेच ज्यामुळे ती लहानवयातच राज्यकारभार जवळून पाहू शकली. वडिलांचे नडोंगो आणि आईचे मतांबा राज्य अशी दोन राज्ये मिळून अँगलो या नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली होती.




