२०व्या शतकातली एक मोठी दुर्दैवी हत्या. अमेरिकन आणि बेल्जियन सरकारने खून घडवून आणलेला पॅट्रिस लुमुंबा... काय राजकारण होतं यामागे?

लिस्टिकल
२०व्या शतकातली एक मोठी दुर्दैवी हत्या. अमेरिकन आणि बेल्जियन सरकारने खून घडवून आणलेला पॅट्रिस लुमुंबा... काय राजकारण होतं यामागे?

काँगो किंवा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो हा मध्य आफ्रिकेतला देश. आफ्रिकेतल्या इतर अनेक मागास देशांप्रमाणे हा देशही युरोपीय वसाहतवादाची शिकार ठरला होता. पॅट्रिस लुमुंबा हे काँगोचे पहिले कायदेशीररित्या निवडून आलेले पंतप्रधान. १७ जानेवारी १९६१ या दिवशी त्यांचा खून करण्यात आला. या हत्येच्या कटात अमेरिका आणि बेल्जियम या दोन देशांच्या सरकारांचा समावेश होता.

जवळपास सव्वाशे वर्षांपासून काँगोची दैवरेखा आखण्यात अमेरिका आणि बेल्जियम या देशांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. १८७० मध्ये बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड याने सर्वप्रथम या देशाची पाहणी करण्यासाठी मोहीम आखली. त्यानंतर त्याने या प्रदेशावर आपला अधिकार घोषित केला आणि ही जमीन त्याची खाजगी मालमत्ता असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी त्याने त्या प्रदेशाला कॉंगो फ्री स्टेट असं नाव दिलं. जेव्हा लिओपोल्डने कॉंगो नदीच्या खोऱ्यालगतच्या या प्रदेशावर दावा केला तेव्हा सर्वप्रथम अमेरिकेने त्याला पाठिंबा दिला. अर्थात अमेरिकाही काही 'दूध की धुली' नव्हती. त्यांचेही हितसंबंध गुंतलेले होते. काँगोचं खोरं हा अतिशय संपन्न प्रदेश होता. या प्रदेशात युरेनियमच्या खाणी होत्या.

पण लिओपोल्डने स्थानिक लोकांना रबराचं उत्पादन घ्यायला भाग पाडलं. गुलामगिरीमुळे मजुरांचं आर्थिक शोषण, रोगराई, कुपोषण असे भयानक परिणाम झाले. क्रूर आर्थिक शोषणामुळे आणि अत्याचारांमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. आता मात्र अमेरिका मध्ये पडली. अमेरिकेने बेल्जियमला कॉंगो हा देश ​​नियमित वसाहत म्हणून ताब्यात घेण्यास भाग पाडलं. या काळातच अमेरिकेने काँगोच्या प्रचंड नैसर्गिक संपत्तीमध्ये भागीदारी मिळवली. काँगोमधल्या युरेनियमच्या खाणीतून युरेनियमचे साठे अमेरिकेच्या हातात पडले. पुढे हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेले अणुबॉम्ब हे याचंच बायप्रॉडक्ट.

पुढे १९६० मध्ये कॉंगो बेल्जियमच्या तावडीतून मुक्त झाला. कॉंगो स्वतंत्र झाल्यावर तिथला राष्ट्रवादी नेता लुमुंबा हा पंतप्रधान बनला. पण त्याच्याच राज्यात त्याला बरेच विरोधक होते. राज्य स्थापन झाल्यावर काही दिवसांतच तिथे लष्कराचं बंड झालं. त्यावेळी लुमुंबाने रशियाकडे मदत मागितली. हे कळताच अमेरिकेने डोळे वटारले.

तो काळ अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या शीतयुद्धाचा होता. मुळात हे युद्ध अमेरिका आणि रशिया यांच्यात सुरू झालं आणि जगातल्या जास्तीत जास्त देशांना आपल्या कह्यात आणण्याची त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. शीतयुद्ध सुरू झाल्यावर अमेरिका आणि तिचे सहकारी देश यांच्यापुढे एक नवीनच प्रश्न उभा राहिला होता : आफ्रिकेत असलेल्या खाणी, तिथली खनिजं अशा स्ट्रॅटेजिकली महत्त्वाच्या कच्च्या मालाचं संरक्षण. काहीही झालं तरी हे देश आफ्रिकन लोकांना या मालावर नियंत्रण ठेवू देणार नव्हते. असं झाल्यास ही महत्त्वाची सामग्री सोव्हिएत छावणीत शत्रूंच्या हातात पडण्याची भीती होती. आणि इकडे तर पॅट्रिस लुमुंबाने काँगोच्या संसाधनांवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा निर्धार केला होता. आपल्या देशबांधवांचं राहणीमान सुधारण्यासाठी तो निर्णय योग्य होता, पण पाश्चात्य हितसंबंधांच्या मात्र तो आड येत होता. त्यामुळे आता अमेरिका आणि बेल्जियम दोघांसाठीही लुमुंबा मोठा शत्रू बनला. मग त्यांनी त्याच्याशी लढण्यासाठी त्याच्याच प्रतिस्पर्ध्यांचावापर केला. त्यांचा पाठिंबा मिळवला आणि त्याच्यावर भाडोत्री मारेकरी घातले.

त्यावेळी काँगोचा अध्यक्ष होता कासावुबु. तोही लुमुंबाच्या विरोधातच होता. या कासावुबुने ५ सप्टेंबर रोजी लुमुंबाला पंतप्रधानपदावरून बडतर्फ केलं. लुमुंबाने त्यास विरोध केला आणि कासावुबुलाच पदच्युत केल्याचं घोषित केलं. यामुळे तिथे काही काळासाठी दोन समांतर सरकारं आली. पण १४ सप्टेंबर रोजी लष्कराने हस्तक्षेप करून लुमुंबाला बाजूला ठेवण्याच्या कासावुबुच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला. लुमुंबाला नजरकैदेत ठेवलं. तिथून तो पळून गेला आणि देशाच्या दुसर्‍या भागात, जिथे त्याला मोठा पाठिंबा होता तिथे, पोहोचण्याचा त्याने प्रयत्न केला. पण डिसेंबरच्या सुरुवातीला सैन्याने त्याला पकडलं आणि नंतर थिसविले नावाच्या गावात लष्करी छावणीत ठेवलं. पुढे ती छावणी त्याला ठेवण्यासाठी सुरक्षित नाही असं वाटल्याने त्याच्या शत्रूंनी त्याला तिथून हलवलं ते थेट कटंगा येथे. कटंगा कधीच त्याचं नव्हतं. तो त्याचा राजकीय शत्रू असलेल्या त्शोम्बेचा बालेकिल्ला होता. विमान प्रवासादरम्यान त्याला आणि त्याच्या साथीदारांना सैनिकांनी मारहाण केली. कटंगामध्ये त्यांना एका खाजगी बंगलीत नेण्यात आलं. तिथे त्यांना परत बेल्जियन आणि कॉंगोलीज सैन्याकडून होणारी मारहाण सहन करावी लागली. त्यानंतर बेल्जियमच्या देखरेखीखाली आणि कटंगन आणि बेल्जियन अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कटंगन गोळीबार पथकाने त्याला फासावर लटकवलं. एका महान नेत्याचा अस्त झाला.

लुमुंबाचं दुर्दैव असं की मेल्यावरही त्याची विटंबना थांबली नाही. त्याचा मृतदेह एका उथळ थडग्यात टाकण्यात आला. नंतर कटंगाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने मृतदेह नाहीसे करण्याचे आदेश दिले. त्या वेळी एका बेल्जियन पोलिस अधिकाऱ्याच्या हाताखालच्या एका गटाने कबरी शोधल्या, मृतदेह खोदले, त्यांचे तुकडे केले आणि शरीराचा जास्तीत जास्त भाग सल्फ्यूरिक ऍसिडमध्ये विरघळवला. जे काही उरलं होतं ते पेटवून दिलं.

ही हत्या घडली तेव्हा देशात चार स्वतंत्र सरकारं होती: किन्शासामधील केंद्र सरकार (तेव्हाचं लिओपोल्ड विले); किसांगानी (तेव्हा स्टॅनले विले), लुमुंबाच्या अनुयायांचे प्रतिस्पर्धी केंद्र सरकार, आणि कटंगा आणि दक्षिण कसाई या खनिजसमृद्ध प्रदेशांमध्ये असलेल्या अलिप्ततावादी राजवटी. लुमुंबाच्या हत्येनंतर पाश्चिमात्य-समर्थक राजवटीचं परत फावलं. या प्रदेशाची सत्ता मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले. ऑगस्ट १९६१ मध्ये किसांगानीमधील लुमुम्बिस्ट राजवटीचा अस्त झाला, तर सप्टेंबर १९६२ मध्ये दक्षिण कसाईचं विभाजन झालं. जानेवारी १९६३ मध्ये कटंगा वेगळं झालं.

काँगोमध्ये, आजही लुमुंबाची हत्या देशाचं सगळ्यात मोठं पाप मानली जाते. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांतच लुमुंबा राष्ट्रीय एकात्मता, आर्थिक स्वातंत्र्य आणि पॅन-आफ्रिकन एकता या आदर्शांची स्वप्नं लाखो लोकांच्या मनात पेरून गेला. त्यामुळे आजतागायत जनमानसात त्याची जागा अबाधित आहे.

स्मिता जोगळेकर