बांगलादेशच्या शेख मुजिबुर रहमान यांची कुटुंबीयांसह हत्या- अवघ्या १० वर्षांत देशाचा राष्ट्रपिता जनतेला वैरी का वाटू लागला?

लिस्टिकल
बांगलादेशच्या शेख मुजिबुर रहमान यांची कुटुंबीयांसह हत्या- अवघ्या १० वर्षांत देशाचा राष्ट्रपिता जनतेला वैरी का वाटू लागला?

१९६६ मध्ये तो मनुष्य त्याच्या देशातल्या लोकांच्या नजरेत हिरो ठरला होता. त्याने आखलेल्या सहा कलमी कार्यक्रमामुळे आपलं भलं होईल अशी लोकांना आशा होती. पण सगळेच फासे उलटे पडले. एकेकाळचा हिरो व्हिलन वाटायला लागला. अवघ्या दशकभराच्या आतच त्याला त्याच्या कुटुंबासह संपवलं गेलं. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबुर रहमान यांची त्यांच्या कुटुंबीयांसह हत्या करण्यात आली. असं का झालं याची उत्तरं त्यांच्या कार्यशैलीत दडली आहेत.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला तोच मुळी भारत आणि पाकिस्तान अशा दोन तुकड्यांत विभागणी होऊन. त्यावेळी भारताच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंना पाकिस्तान होता. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांचं राहणीमान, संस्कृती, बोलीभाषा सगळंच वेगळं होतं. असं असूनही पूर्व पाकिस्तानवर पश्चिम पाकिस्तानची सत्ता होती. मोहम्मद अली जिना यांनी सुरुवातीपासूनच पूर्व पाकिस्तानबद्दलचे विचार स्पष्ट बोलून दाखवले होते. पूर्व पाकिस्तानने बंगाली भाषा सोडून उर्दू भाषा स्वीकारावी, हा त्यांचा नेहमीचा हेका. पूर्व पाकिस्तानच्या लोकांना नेहमीची दुय्यम दर्जाची वागणूक, सापत्नभाव सहन करणं अशक्य झालं होतं. दरम्यान मुजिबुर रहमान या पूर्व पाकिस्तानच्या नेत्याने सुरुवातीपासूनच स्वतंत्र देशाची मागणी केली होती. त्यासाठी त्यांचा अविरत लढा सुरू होता.

मुजिबुर रहमान हे 'मुस्लिम स्टुडन्ट लीग'चे कार्यकर्ते होते. ही जिनांच्या 'मुस्लिम लीग'ची विद्यार्थी शाखा. पुढे त्यांनी स्वतंत्र संसार थाटत आवामी लीग या पक्षाची स्थापना केली. आपल्या पक्षाद्वारे त्यांनी स्वतंत्र देशाची मागणी परत एकदा रेटली. पूर्व पाकिस्तानवर होणाऱ्या अन्यायालाही विरोध करणं सुरू ठेवलं. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली. १९७० च्या निवडणुकांमध्ये त्यांना घवघवीत यश मिळालं. इतकं, की पश्चिम पाकिस्तानातही त्यांच्या पक्षाचे उमेदवार भरघोस मताधिक्क्याने निवडून आले. सत्तांतर होऊन मुजिबुर रहमान यांच्या पक्षाकडे सत्ता जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली. परंतु पश्चिम पाकिस्तानने त्यांच्या हातात सत्ता द्यायला नकार दिला. इतकंच नाही, तर त्यांना तुरुंगात टाकलं.

अखेर १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि बांगलादेश या नावाने ओळखला जाऊ लागला. बांगलादेशच्या निर्मितीनंतर १९७२ मध्ये मुजिबुर रहमान पाकिस्तान जेलमधून सुटून मायदेशी परतले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी लाखो लोक जमले होते. पण हा जल्लोष, आनंद, उत्साह काही फार काळ टिकला नाही. या नव्या देशापुढे गरिबी, वाढती लोकसंख्या, शिक्षणाचं अल्प प्रमाण अशी अनेक आव्हानं होती.

शेख मुजिबुर रहमान काहीतरी चमत्कार करतील, भव्यदिव्य करून दाखवतील असं लोकांना वाटत होतं. पण घडलं उलटंच. त्यांच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री फक्त भ्रष्टाचारातच पुढे होते. परिणामी देशातली गरीबी वाढत गेली. भरीत भर बांगलादेशात दुष्काळाने कहर माजवला. रोजचा भूकबळींचा आकडा वाढत चालला. ही परिस्थिती हाताळण्यात मुजिबुर रहमान अयशस्वी ठरले. त्यांनी आणखी एक चूक केली. १९७४ सालच्या डिसेंबरमध्ये त्यांनी बांगलादेशमध्ये आणीबाणी जाहीर केली. या आणीबाणीमुळे सगळे अधिकार त्यांच्याच हातात एकवटले. त्या काळात सरकारला विरोध करणाऱ्या अनेक लोकांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांना विरोध करणारं कुणी उरलं नाही. जोडीला त्यांनी २४ फेब्रुवारी १९७५ या दिवशी बक्साल (Bangladesh Krishak Sramik Awami League (BAKSAL)) पक्षाची स्थापना केली. देशातला प्रत्येक पक्ष, छोटा गट हे सगळे या पक्षात विलिन केले. त्यामुळे विरोध आणि विरोधक दोन्ही संपुष्टात आले. इथेच त्यांच्या आणि नागरिकांच्या मध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली. जूनमध्ये त्यांनी वर्तमानपत्रांवरदेखील बंदी घातली.

त्यांनी बांगलादेशमधल्या डाव्यांना संपवण्यासाठी एक समांतर लष्कर स्थापन केलं होतं. या लष्कराने बांगलादेशामधल्या डाव्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्यांच्या हत्या केल्या. त्यामुळेही लोकांच्या मनात शेख मुजिबुर रहमान यांच्याबद्दलचा रोष वाढायला लागला. या सगळ्या घटनांमुळे बांग्लादेशच्या लष्कराने आणि आवामी लीगच्या काही असंतुष्ट सहकाऱ्यांनी त्यांचा काटा काढायचं ठरवलं. यासाठी त्यांनी शेख मुजिबुर रहमान यांच्या मंत्रिमंडळातल्या खोंडाकेर मुश्ताक अहमद या मंत्र्याला राष्ट्रपतीपदाची लालूच दाखवली. या संधीला अहमद भुलले.

१५ ऑगस्ट १९७५ या दिवशी सकाळी चार छोट्या गटांमध्ये विभागलेले आर्मीचे गट एकाच वेळी मुजिबुर रहमान यांच्या घरावर चालून गेले. रहमान यांचा मुलगा शेख कमाल याला तळमजल्यावरच्या स्वागतकक्षातच गोळी मारण्यात आली. सुरुवातीला या सगळ्या प्रकाराबद्दल मुजिबुर रहमान यांना काहीच माहिती नव्हती. शेख कमालवर झालेल्या गोळीबाराचा आवाज ऐकून ते जिना उतरत खाली आले आणि तिथे स्टेनगन घेऊन उभ्या असलेल्या माणसाला, "तुम्ही काय करत आहात?" अशी विचारणा केली. शेख मुजिबुर रहमान यांचा प्रभाव इतका होता, की तिथे असलेले लोक क्षणभर थोडेसे गोंधळून गेले. पुढे ते म्हणाले, "जिथे पाकिस्तान मला मारू शकला नाही, तिथे तुम्ही मला मारणार?" त्यांचं वाक्य पूर्ण होतं न होतं, तोच त्या स्टेनगनधारी माणसाला मेजर हुड्डा यांनी रहमान यांना शूट करण्याचा आदेश दिला. त्या माणसानेही त्याची अख्खी स्टेनगन शेख मुजिबुर रहमान यांच्यावर गोळ्या घालून रिती केली. त्यावेळी जिन्यात असलेले रहमान जमिनीवर कोसळले. त्यांच्याबरोबर तिथे हजर असलेल्या सगळ्यांना त्यावेळी ठार करण्यात आले. यात त्यांच्या पत्नी, मुलं, सुना, नोकर हेही होते. फक्त त्यांच्या दोन मुली, शेख रेहाना आणि शेख हसीना वाजेद वाचल्या कारण त्या त्यावेळी पश्चिम जर्मनीमध्ये होत्या.

त्यांच्या हत्येनंतर सत्ता परिवर्तन होऊन सर्व सत्ता लष्कराच्या हाती आली आणि अनियंत्रित अनागोंदीला, खूनखराब्याला सुरुवात झाली. शेख रहमान यांच्या हत्येपाठोपाठ त्यांचे समर्थक असणारे उपराष्ट्रपती सय्यद नजरुल इस्लाम, पूर्वीचे गृहमंत्री इत्यादी नेत्यांना अटक करण्यात आली. खोंडाकेर मुश्ताक यांच्या हाती सत्ता आली. त्यानंतर ३ नोव्हेंबरला परत एकदा सत्तापालट होऊन जनरल खालीद मुशर्रफ यांच्या हाती सत्ता आली. नंतर अवघ्या चारच दिवसांत परत एकदा सत्तापालट झाला. हे सत्र पुढेही सुरू राहिलं. पुढे १९९० मध्ये लष्कराची सत्ता संपुष्टात आली आणि निवडणूक होऊन आवामी लीग परत एकदा सत्तेत आली.

स्मिता जोगळेकर