२०० महिलांनी नागपूरच्या कोर्टात या नराधमाला ठेचून का मारले होते?

लिस्टिकल
२०० महिलांनी नागपूरच्या कोर्टात या नराधमाला ठेचून का मारले होते?

सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनवण्याची संख्या सध्या वाढत आहे. दाक्षिणात्य चित्रपट ‘जयभीम’ नंतर आता चर्चा सुरू आहे ती ‘२०० हल्ला हो‘ची. अमोल पालेकर, रिंकू राजगुरू, उपेंद्र लिमये, बरून सोबती, इंद्रनील सेनगुप्ता असे स्टारकास्ट असलेला हा सिनेमा नागपूरमध्ये १७ वर्षापूर्वी घडलेल्या एका जमावाने हल्ला करुन खून करण्याच्या घटनेवर आधारित आहे.

२०० पेक्षा जास्त महिलांनी नागपूरमधील भरत कालीचरण ऊर्फ अक्कू यादव नावाच्या एका बेलगाम गुंडाचा कोर्टाच्या आवारातच खून केला होता. त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनाही या महिलांनी सोडलं नव्हतं. कोण होता हा भरत कालीचरण ऊर्फ अक्कू यादव, आणि महिलांना त्याची एवढी चीड का होती? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.

नागपूरमधील कस्तुरबा नगरमध्ये राहणाऱ्या महिलांना या भरतने अगदी जगणे नकोसे करून टाकले होते. भरत कालीचरण या वस्तीतला एक महागुंड. पोलिसांना दारू आणि पैसे चारून त्यांचे तोंड बंद केल्याने भरतला हटकणारे कोणी नव्हतेच. पैसा आणि पोलिसांचे संरक्षण यामुळे भरत म्हणजे जणू एक हिंस्न्र पशू बनला होता. कस्तुरबा नगरात राहणारी एकही महिला सुरक्षित नव्हती. कारण या वस्तीतील तब्बल ४० महिलांवर भरत आणि त्याच्या साथीदारांनी मिळून बलात्कार केले होते. काही जणींची तर बलात्कार करून निर्घृण हत्या केली होती. त्याचे क्रूर कारनामे वाचून तुम्हीही हादरून जाल.

अगदी दिवसाढवळ्या कुठल्याही घरात शिरून त्या घरातल्या महिलेला ओढत बाहेर आणायचे आणि तिला शेजारच्या पडक्या इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार करायचा हा जणू भरतचा शिरस्ताच बनला होता. पोलिसांत तक्रार द्यायला गेल्यावर पोलीस कसलीच दाद घेत नव्हते. उलट तुम्ही बायका नीट वागत नाही म्हणूनच तुमच्यावर असे प्रसंग येतात असे बोलून घडल्या प्रसंगांना त्या महिलांनाच जबाबदार ठरवले जायचे. या वस्तीत राहणाऱ्या महिलांना कुणीच वाली उरला नव्हता. भरत आणि त्याच्या गुंडांनी एका दहा महिन्याच्या बाळंतीणीवरही असाच बलात्कार केला. निरपराध्यांवरचा हा असा अन्याय सहन न झाल्याने कलमा नावाच्या या महिलेने केरोसीन ओतून घेतले आणि पेटवून घेऊन आत्महत्या केली.

सात महिन्याच्या एका गरोदर बाईचीही या हैवानांना दया आली नाही. तिलाही भर रस्त्यात घेऊन नग्न करून पळवले आणि तिच्यावर सर्वांदेखत बलात्कार केला. प्रौढ महिलाच नाही, तर दहा-बारा वर्षाच्या कोवळ्या मुलीही या वासनांध नराधमाच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या. पोलिसांनी तर कधीचाच या सगळ्या प्रकाराकडे कानाडोळा केला होता. ते उलट या महिलांनाच तुम्ही चारित्र्यहीन आहात म्हणून तुमच्यावर बलात्कार होतात असे बोलत असत.

भरत कालीचरणला १४ वेळा अटक झाली होती. पण तो पुन्हा सुटून येत असे. बलात्कार, खून, खंडणी, लुटमार असे गंभीर गुन्हे करूनही त्याच्यावर अगदी किरकोळ कलमे लावूनच गुन्हा दाखल होत असे आणि पुन्हा त्याचे तेच उद्योग सुरू होत.

तो दिवस होता १३ ऑगस्ट २००४. दुपारी २ ते ३ च्या दरम्यान कस्तुरबानगरमधल्या महिलांना कळले की कोर्टात त्याच्यावर खटला सुरू आहे आणि पोलीस त्याला कोर्टात घेऊन जात आहेत. हे कळताच कस्तुरबा नगरमधल्या सर्व महिला कोर्टाच्या आवारात जमल्या. ज्या ठिकाणी त्याची सुनावणी सुरू होती थेट तिथे या महिला घुसल्या. प्रत्येकीने ओढणी, साडीचा पदर किंवा घरातील एखादे जुने फडके जे काही हाताशी येईल त्याने आपले तोंड बांधले होते. कुणाच्या हातात चटणी होती, कुणाकडे चाकू, कुणाकडे दगड, गोट्या, अशा हत्यारासह महिलांचा हा बिथरलेला जमाव कोर्टात घुसला. त्यातील एका महिलेने भरतला शिवी घातली आणि तिला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून त्यानेही शिवी दिली.

ही महिला इतकी चवताळली होती की, “आज एकतर तू या जगात राहशील नाही तर मी” असे म्हणत तिने भरतच्या अंगावर झेप घेतली, त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांच्या डोळ्यातही मिरची पूड टाकण्यात आली आणि सगळ्या महिलांनी एकाच वेळी भरतवर हल्ला चढवला. सगळ्या कोर्टरूममध्ये रक्ताचे डाग पसरले होते. प्रत्येकीला त्याला किमान एक तर ठोसा लगावायचाच होता. कुणी त्याला चाकूने भोसकले, कुणी त्याच्या डोळ्यात चटणी टाकली, कुणी त्याच्या तोंडात दगड आणि गोट्या कोंबल्या, तर एकीने त्याचे शिश्नच छाटून टाकले. २०० महिलांच्या त्या जमावासमोर पोलीसही हतबल ठरले. या स्त्रियांच्या मारहाणीतच भरतचा जीव गेला.

“मी परत असे करणार नाही, मला एकदा माफ करा,” अशा गयावया करत तो पाया पडत होता. पण आता त्याच्या पापाचा घडा पूर्ण भरला होता. त्याच्या या अजीजीला कुणीही भीक घातली नाही. त्याचा जीव घेऊनच सगळ्या महिलांचा जीव भांड्यात पडला. त्यांच्या डोक्यावरील एक मोठं ओझं आज उतरलं होतं. वर्षानुवर्षे त्यांनी सहन केलेल्या अन्यायाला आज न्याय मिळाला होता. कायदा सुव्यवस्थाच जेव्हा आंधळी, बहिरी होते तेव्हा सामान्य नागरिकाला कायदा हातात घेण्याची वेळ येते.

या सत्य घटनेवरच “२०० हल्ला हो” हा चित्रपट आधारलेला आहे. भरत कालीचरणला संपवल्यानंतरही त्या महिलांना कायद्याशी कसा लढा द्यावा लागला आणि तब्बल दहा वर्षे हा लढा दिल्यानंतर पुराव्यांअभावी त्यांची कशी सुटका करण्यात आली हे जाणून घ्यायचे असेल तर हा चित्रपट पाहायलाच हवा.

स्त्रियांचा सन्मान, जातीय विषमता अशा अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा हा चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

मेघश्री श्रेष्ठी