भारतातले नागिराकांकडून चालवले जाणारे एकमेव रेल्वे स्टेशन आता पुन्हा भारतीय रेल्वेकडे जाईल की बंद पडेल? पण का?

लिस्टिकल
भारतातले नागिराकांकडून चालवले जाणारे एकमेव रेल्वे स्टेशन आता पुन्हा भारतीय रेल्वेकडे जाईल की बंद पडेल? पण का?

भारतीय रेल्वे ही भारतीय सीमांतर्गत येणारी सर्व रेल्वे स्थानकं चालवते. म्हणजे ज्या कोणत्याही स्टेशनला रेल्वे थांबते तिथला संपूर्ण खर्च आणि देखभाल भारतीय रेल्वे डिपार्टमेंट स्वतः करते. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की देशात असे एक रेल्वे स्थानक आहे, जे भारतीय रेल्वे नाही तर गावातील लोक चालवतात. या रेल्वे स्थानकाची संपूर्ण जबाबदारी ग्रामस्थांच्या हाती आहे. हे रेल्वे स्टेशन गावकरी का चालवतात, यामागे एक मनोरंजक कारण आहे! जे आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.

राजस्थानच्या नागौरचे जालसू नानक रेल्वे स्थानक हे देशातील पहिले असे रेल्वे स्थानक आहे, जेथे कोणीही रेल्वे अधिकारी किंवा कर्मचारी नाही.. हे अनोखे रेल्वे स्टेशन राजस्थानमध्ये आहे आणि नागौर जिल्ह्यापासून सुमारे ८२ किमी अंतरावर आहे. दर महिन्याला इथले गावकरी लोक पैसे जमा करून सुमारे १५०० तिकिटे खरेदी करतात.

२००५ पासून हे रेल्वेस्थानक गावकरी चालवत आहेत. कारण तेव्हाच भारतीय रेल्वेने हे स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसे पाहिले तर या स्थानकावर भारतीय रेल्वेला दरमहा ३० हजार रुपयांचे उत्पन्नही मिळत आहे. येथे १० हून अधिक गाड्या थांबतात. हे स्थानक बंद करण्यामागे महत्वाचे कारण होते रेल्वे विभागातली कमी महसूल असलेली स्थानके बंद करण्याचे रेल्वेचे धोरण. त्यानुसार २००५ साली हे स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु गावकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यासाठी त्यांनी ११ दिवस धरणे धरले.

तेव्हा रेल्वेने गावकऱ्यांसमोर एक अट घातली की त्यांनी हे रेल्वे स्टेशन स्वतः चालवावे. ग्रामस्थांनी हे मान्य केले. मात्र त्यासाठी पैसे उभारावे लागणार होते. पण त्यांनी हिंमत न हारता देणगीतून दीड लाख पैसे जमा केले. त्यातून १५०० तिकिटेही खरेदी केली. यानंतर एका गावकऱ्याला ५००० रुपये पगारावर तिकीट विक्रीसाठी स्थानकावर बसवण्यात आले. तेव्हापासून आजतागायत हे स्थानक ग्रामस्थ चालवत आहेत.

परंतु हे स्टेशन चालवणे इतके सोपे नाही. ईश्वर सिंग जे हे स्थानक ५ वर्ष चालवतात ते म्हणतात की, "तिकीट विक्रीतून मिळणारे कमिशन हे तुटपुंजे आहे. कधीकधी तर त्यांना स्वतःच्या खिशातून पैसे टाकावे लागले आहेत. तसेच रात्रीच्या वेळी स्थानकावर प्रवाशांना संरक्षण देणे अवघड जाते. कारण रात्री कोणी रक्षक नेमणे म्हणजे अजून पैसे खर्च करावे लागतात. जे शक्य होत नाही."

आजवर गावकऱ्यांनी चालवलेले एकमेव रेल्वे स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थानकाची ही ओळखही लवकरच पुसली जाईल. गावकऱ्यांनी आता हे त्यांना शक्य होत नाही हे भारतीय रेल्वेला कळवले आहे. इथे स्टेशन चालवण्यासाठी नेमलेल्या माणसाला हे काम करता येणे शक्य राहिले नाहीय, अधिक माणसे नेमण्यासाठी पुरेसा निधी नाही. या दोन्ही कारणांसाठी आता हे स्टेशन कदाचित भारतीय रेल्वे चालवायला घेईल किंवा ते बंद पडेल.

जालसू नानक हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. इथल्या प्रत्येक घरात एक सैनिक आहे. सध्या २०० हून अधिक मुले आर्मी, बीएसएफ, नेव्ही, एअरफोर्स आणि सीआरपीएफमध्ये आहेत. तर गावात अडीचशेहून अधिक निवृत्त सैनिक आहेत. सुमारे ४५ वर्षांपूर्वी म्हणजे १९७६ साली या सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या येण्याजाण्यासाठी रेल्वेने येथे हॉल्ट स्टेशन सुरू केले. परंतु रेल्वेच्या आर्थिक धोरणामुळे ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे चालवण्याचा निर्णय घेतल्याने हे असे भारतातले पहिले रेल्वेस्थानक बनले होते.

शीतल दरंदळे