सामन्यातील असामान्य - भाग ४: गोरगरीबांसाठी स्वतःची बाईक रुग्णवाहिका म्हणून वापरणारे 'बाईकवाले ऍम्ब्युलन्स दादा'!!

लिस्टिकल
सामन्यातील असामान्य - भाग ४: गोरगरीबांसाठी स्वतःची बाईक रुग्णवाहिका म्हणून वापरणारे 'बाईकवाले ऍम्ब्युलन्स दादा'!!

भारतातले अनेक परिसर आजही मागास आहेत. कदाचित हेच कारण असेल ज्यामुळे तिथे शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, रोजगार अशा सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आजच्या काळात या सर्व सुविधा व्यवस्थित आयुष्य जगण्यासाठी गरजेच्या आहेत. अशा परिसरात एखादा अवलिया असतो जो स्वतःचे जिवन या लोकांचे सुधारण्यासाठी वेचत असतो.

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील धालाबाडी गावाचा परिसर देखील असाच मागास आहे. तिथे एखाद्याला दवाखान्यात घेऊन जायचे असेल तर कसे घेऊन जायचे हाच मोठा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत करीमुल हक नावाच्या एका व्यक्तीने आपल्या मोटरसायकलला रुग्णवाहिकेत रुपांतरीत केले. गेली कित्येक वर्ष ते आपल्या मोटारसायकलवर रुग्णांना घेऊन दवाखान्यात जात आहेत. त्यांच्या या निस्वार्थ समाजसेवेचा गौरव म्हणून त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मान केला आहे.

करीमुल हक हे चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे साधारण गृहस्थ होते. त्यांच्या आईला योग्य वेळी गाडी न मिळाल्याने त्यांचे निधन झाले. या धक्क्यामुळे यापुढे एकही जीव दवाखान्यापर्यन्त जाता आले नाही म्हणून मृत्युमुखी पडायला नको असा त्यांनी निश्चय केला. त्यांचा निश्चय आजही जसाचा तसा असलेला पाहायला मिळत आहे. आज करीमुल हक यांचं वय आज ५० वर्षे आहे. त्यांना जलपाईगुडी परिसरात बाईकवाले ऍम्ब्युलन्स दादा म्हणून ओळखले जाते.

एकदा चहाच्या मळ्यात काम करत असताना एक मजूर अचानक आजारी पडला. त्याला दवाखान्यात नेण्यासाठी हक यांनी स्वतःची मोटारसायकल वापरली. येथूनच त्यांना आपली मोटारसायकल रुग्णवाहिकेचे काम करू शकते याची कल्पना आली. आता परिस्थिती अशी आहे की आसपासच्या परिसरात कुणीही आजारी असेल तर हक यांना बोलावले जाते आणि हक त्या व्यक्तीला व्यवस्थितपणे दवाखान्यात पोहोचवतात. तेथील डॉक्टर सांगतात की हक यांनी आजवर तब्बल ३००० जीव वाचवले आहेत. एवढेच नाहीतर दवाखान्यात घेऊन जाण्यापूर्वी ते रुग्णाचा प्रथमोपचार देखील करतात.

हक यांची मोटारसायकल ही त्यांचे गाव तसेच आजूबाजूच्या २० गावांची लाईफलाईन   आहे. जवळ दवाखाना नसल्याने या लोकांना 45 किलोमीटर दूर जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. वास्तविक करीमुल हक हे एक सामान्य गरीब मजूर आहेत. त्यांच्या आयुष्यात प्रचंड अडचणी आहेत असे असून देखील त्यांनी त्यांचे कार्य गेली 20 वर्ष सुरू ठेवले आहे. याच कामामुळे एक सामान्य मजूर असलेला व्यक्ती पद्मश्रीचा मानकरी ठरला आहे.