भारतातले शेवटचे दुकान, बीच, गाव, रस्ता, रेल्वे स्टेशन.. हे सगळं पाहा इथेच!!

लिस्टिकल
भारतातले शेवटचे दुकान, बीच, गाव, रस्ता, रेल्वे स्टेशन.. हे सगळं पाहा इथेच!!

देशभरात लाखो दुकाने असतील, लाखो-करोडो रुपये खर्च करून बनविलेल्या दुकानांचे नसतील इतके या दुकानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. कारण तुम्हाला समजले असेल, हे आहे भारतातील शेवटचे दुकान!! इथून पुढे चीनची सीमा सुरू होते. म्हणून दुकानाचे नाव पण हिंदुस्थान की अंतिम दुकान असे आहे.

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हे दुकान आहे. २५ वर्षांपूर्वी इथे एकही दुकान नव्हते. मग चंदर सिंग बडवाल यांनी हे दुकान सुरू केले होते. ३११८ मीटर्सच्या उंचीवर हे दुकान असून चीनची सीमा या दुकानापासून अवघ्या काही अंतरावर आहे. हिमालयाच्या कुशीत चहा पिण्याचा मनसोक्त आनंद या इथे घेता येऊ शकतो.

 

भारतातले शेवटचे गाव

भारतातले शेवटचे गाव

आता या बाबतीत दोन गावे अशी आहेत, ज्यांना भारताचे शेवटचे गाव म्हटले जाऊ शकते. चिटकुल हे इंडो- तिबेट बॉर्डरवर असलेले शेवटचे गाव समजले जाते. पण उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यातील माना हे गावही अधिकृतपणे शेवटचे गाव समजले जात असे. हे गाव बद्रीनाथ पासून अवघ्या ३ किमी अंतरावर आहे.

सरस्वती नदीच्या काठावर हे गाव वसले आहे. मे-जून महिन्यात जेव्हा मोठ्या प्रमाणावर लोक बद्रीनाथ दर्शनाला येत असतात. तेव्हा भारतातील हे शेवटचे गाव बघण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. ३२१९ मीटर उंचीवर वसलेले हे गाव हिमालयीन रांगेने वेढेलेले आहे.

भारतातला शेवटचा रस्ता

भारतातला शेवटचा रस्ता

धनुषकोडी हा भारतातला शेवटचा रस्ता आणि जागा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. गिटाराच्या आकाराचा हा रस्ता जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. इथून समुद्र सुरू होतो आणि तेथून पुढे अवघ्या ३१ किमीवर श्रीलंका आहे. तामिळनाडूच्या पाम्बन बेटावर हा रस्ता आहे.

१९६४ साली आलेल्या मोठ्या चक्रीवादळात धनुषकोटी नावाचे हे गाव नष्ट झाले होते. याच ठिकाणाहून रामसेतू बनविण्यास सुरुवात झाली होती असेही सांगितले जाते.

भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन

भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन

पश्चिम बंगाल येथील मालदा जिल्ह्यातील सिंघाबाद रेल्वे स्टेशन हे भारतातील शेवटचे आणि अतिशय जुने रेल्वे स्टेशन आहे. येथून पुढे बांगलादेशची सीमा सुरू होते. स्वातंत्र्यापूर्व काळात तयार झालेले हे स्टेशन आजही तसेच आहे.

दक्षिणेला शेवटचे रेल्वे स्टेशन हे कन्याकुमारी असे आहे. उत्तरेला बारामुल्ला हे शेवटचे स्टेशन आहे, तर पश्चिमेला भूज हे शेवटचे रेल्वे स्टेशन आहे.

भारतातला शेवटचा बीच

भारतातला शेवटचा बीच

कन्याकुमारी हे कमालीचे सुंदर असे ठिकाण अनेकार्थाने महत्वाचे आहे. कन्याकुमारी बीच भारतातला शेवटचा बीच आहे. ही जागा तिन्ही समुद्रांचा संगम समजली जाते. यात अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर यांचा हा संगम आहे.

उदय पाटील