अवघ्या ३८ मिनिटांत संपलेलं जगातलं सर्वात लहान युद्ध!! हे कोणाकोणांत, का आणि कुठे लढलं गेलं?

लिस्टिकल
अवघ्या ३८ मिनिटांत संपलेलं जगातलं सर्वात लहान युद्ध!! हे कोणाकोणांत, का आणि कुठे लढलं गेलं?

जगातल्या अगदी सर्वच प्राण्यांमध्ये युद्धाची खुमखुमी पाहायला मिळते. त्यातही मानवी युद्धांमुळे तर हवामान, भूगोल, इतिहास सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो. युद्धाच्या परिणामांची सावली भविष्यकाळावरही रेंगाळत राहते. इतिहासातील अनेक युद्धातून संहाराशिवाय काहीही निष्पन्न होत नाही हे एव्हाना लक्षात आले असले, तरी कधीकधी युद्ध ही एक अटळ घटना होऊन बसते. तर अशाच अनेक युद्धांपैकी आज आम्ही जगातील सर्वात छोट्या युद्धाची गोष्ट सांगणार आहोत. अवघ्या ३८ मिनिटांत हे युद्ध संपुष्टात आले होते, म्हणून याला जगातले सर्वात छोटे युद्ध म्हटले जाते.

१८९६ साली लढण्यात आलेले हे युद्ध अँग्लो-झांझिबार युद्ध म्हणूनही ओळखले जाते. या युद्धाची बीजे १८९०च्या हेलिगोलँड-झांझिबार करारामध्ये लपली होती. या करारानुसार झांझिबारचा ताबा ब्रिटिश सत्तेकडे सुपूर्द करण्यात आला होता, तर टांझानियावर जर्मनीचा अधिकार प्रस्थापित झाला होता. नकाशावर पाह्यलंत तर टांझानिया आणि झांझिबार हे आफ्रिका खंडातले एकमेकांचे शेजारी प्रदेश आहेत. सध्या झांझिबार हे टांझानिया देशाचा भाग आहे. तर या हेलिगोलँड-झांझिबार कराराच्या अनुषंगाने ब्रिटनने झांझिबार हा त्यांचाच संरक्षित भूभाग असल्याचे जाहीर केले. झांझिबारचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी स्थानिक सुलतान निवडला असला तरी तो त्यांच्या हातचे बाहुले बनून राहील याची त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली होती. १८९३ साली हमाद बिन थुवैन हे झांझिबारचे ब्रिटिश पुरस्कृत अध्यक्ष बनले.

हमादला गादीवर बसून तीन वर्षे झाली नाहीत, तोवरच तिथे त्याच्याविरोधात कट रचले जाऊ लागले. झांझिबारमधली शांतता भंग पावली. २५ ऑगस्ट १८९६ रोजी अचानकच तो त्याच्या महालात मृतावस्थेत आढळून आला. त्याचा चुलत भाऊ खालिद बिन बघाशाहने राजगादीच्या आमिषाने त्याचा खून केला असण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात येत होता. कारण हमादच्या मृत्यूनंतर खालिदने लगेचच झांझिबारच्या राजसत्तेची सूत्रे आपल्याकडे घेतली. झांझिबार ब्रिटिश अधिपत्याखालील राज्य आहे याचा जराही विचार न करता त्याने स्वतःला झांझिबारचा राजा घोषित केले. अर्थातच ब्रिटिशांना त्याचे हे वागणे अजिबात रुचले नव्हते. ब्रिटिश अधिकारी बेसिल केव्ह यांनी खालिदला राजसत्तेवरून खाली खेचले पाहिजे असे लगेचच जाहीरही केले. बेसिल केव्हने खालिदला बऱ्याचदा सूचना दिल्या. त्याने मात्र ब्रिटिशांच्या सूचनांकडे साफ कानाडोळा केला.

उलट खालिदने ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढण्यासाठी फौजेची जमवाजमव सुरू केली. वेळ पडलीच तर तो ब्रिटिशांशी युद्ध करण्यास तयार होता. आपल्या संरक्षणासाठी त्याने महालाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवला. महालाबाहेर सुमारे ३००० सैनिक हत्यारांनिशी सज्ज होते. त्यांच्याकडे आधुनिक बंदुका आणि गनदेखील होत्या. गंमत म्हणजे यातली बरीच शस्त्रे माजी राजाला ब्रिटिशांनीच भेट म्हणून दिली होती. वेळ पडलीच तर म्हणून जवळच्या बंदरावर एक जहाजदेखील तैनात होते.

तर तिकडे ब्रिटिशदेखील युद्धासाठी तयार होते. त्यांनी आधीच दोन युद्धनौका तयार ठेवल्या होत्या. एच.एम.एस. फिलोमेल आणि एच.एम.एस. रश ही दोन ब्रिटिश जहाजे बंदरात तैनात होती. ब्रिटिश दूतावासाचे रक्षण करण्यासाठी मोठी फौज नेमण्यात आली. शिवाय स्थानिक लोकांनी बंड केलेच तर त्यांचे बंड ताबडतोब चिरडता येण्यासाठी म्हणूनही ठिकठिकाणी ब्रिटिश सैनिक विखुरले होते. गरज पडलीच हाताशी असावे म्हणून त्यांनी आणखी एक युद्धनौका एच.एम.एस. स्पॅरोदेखील मागवून घेतली.

ही सगळी युद्धसज्जता फक्त २५ ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंतच झाली होती. अर्थात केव्ह यांनीही सैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले तरी ब्रिटिश सरकारकडून युद्ध सुरू करण्याचा इशारा मिळाल्याशिवाय ते काहीही करू शकत नव्हते हे त्यांना माहित होते. ब्रिटिश सरकारला घडलेल्या घटनेची बातमी देऊन त्यांनी शांततेने मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कळवले. या प्रयत्नात यश आले नाहीच तर आम्हाला युद्ध करण्याची परवानगी मिळावी अशी विनंतीही केव्ह यांनी ब्रिटिश सरकारला केली. पण ब्रिटिश सरकारकडून यावर काही लवकर प्रतिक्रिया दिली नाही.

इकडे केव्ह खालिदला धोक्याचे आणि वेळीच माघार घेण्याचे इशारे देत राहिले, पण खालिदवर काहीच परिणाम होत नव्हता. दुसऱ्या दिवशी ब्रिटिशांनी केव्ह यांच्या मदतीसाठी आणखी दोन युद्धनौका पाठवल्या आणि "तिथली परिस्थिती हाताळण्यास जो योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घ्या आणि तुमच्या निर्णयाला पाठींबा देऊ" असा निरोपही दिला.
२६ ऑगस्टला खालिदला पुन्हा एकदा शेवटची इशारावजा सूचना देण्यात आली. यामध्ये चोवीस तासांत जर त्याने महाल खाली केला नाही तर त्याच्याविरोधात युद्ध पुकारण्याची चेतावणी देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता खालिदने तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही, अशा आशयाचा खलिता केव्ह यांना पाठवला. यावर केव्ह यांनीही "जोपर्यंत तुमच्याकडून काही आगळीक होत नाही तोपर्यंत आम्हीही तुमच्यावर हल्ला करणार नाही, पण तुम्ही जर हल्ला केलात तर त्याचे जशास तसे उत्तर दिले जाईल", असे खरमरीत उत्तर दिले.

यावर खालिदने काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे सकाळी ९ वाजता ब्रिटिश जहाजांना त्याठिकाणी बॉम्ब वर्षाव करण्याचे आदेश देण्यात आले.
तुमच्या हुकुमशाहीसमोर झुकणार नाही असे म्हणणारा खालिद अवघ्या काही मिनिटांत महाल आणि जनतेला वाऱ्यावर सोडून पळून गेला. फक्त दोन मिनिटांत त्याचे निम्म्याहून अधिक सैन्य मारले गेले.

९.०२ वाजता ब्रिटिशांनी त्याच्यावर हल्ला सुरू केला आणि ९.४० ला खालिदचा झेंडा खाली उतरवण्यात आला. अशापद्धतीने अवघ्या ३८ मिनिटांत जगातील हे सर्वात छोटे युद्ध संपुष्टात आले. अवघ्या ३८ मिनिटांत जरी युद्ध संपले असले तरी यात खालिदच्या ५०० सैनिकांचा मृत्यू झाला होता. म्हणजे अगदी छोटे युद्ध असले तरी त्यामानाने या युद्धात खूपच सैनिक मरण पावले होते. एक ब्रिटिश अधिकारीसुद्धा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार केल्यानंतर तो बरा झाला.

खालिद पळून गेल्यानंतर झांझिबारच्या शासकपदी हामूद हा नवा ब्रिटिश धार्जिणा सुलतान नेमण्यात आला. खालिदने जर्मन दूतावासात राजाश्रय घेतला. त्याच्यासोबत त्याचे काही एकनिष्ठ साथीदारही होते. जर्मन दूतावासाने त्याला सुरक्षितपणे देशाबाहेर काढले. ब्रिटिशांनी त्याला आपल्याकडे सोपवण्याची वारंवार विनंती करूनही जर्मनीने खालिदला ब्रिटिशांकडे सोपवले नाही. खालिद आताच्या टांझानिया प्रांतात लपून बसला होता. १९१६ साली ब्रिटिशांनी पूर्व आफ्रिकेवर हल्ला केला. तेव्हा खालिद ब्रिटिशांच्या हाती लागला. त्याला कैद करून सेंट हेलेना येथे ठेवण्यात आले. काही वर्षांच्या शिक्षेनंतर त्याला पुन्हा पूर्व आफ्रिकेत परतण्याची मुभा देण्यात आली. शेवटी १९२७ मध्ये खालिदचा मृत्यू झाला.

हा होता जगातील सर्वात छोट्या कालावधीत लढल्या गेल्याचा युद्धाचा किस्सा!

मेघश्री श्रेष्ठी