जब तक धडकनें हैं, तब तक सांसें हैं... अगदी खरं आहे. हृदय हा तसं पाहता शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव. जिवंतपणाचं लक्षण म्हणजे त्याचं धडधडणं. पण कधीतरी त्याच्यावरच बिचाऱ्यावर इतका ताण येतो, की ते पार निकामी होतं, दुरुस्त होण्यापलीकडे जातं. कधी कधी जन्मतःच ते फारसं तंदुरुस्त नसेल तर लवकर काम करेनासं होतं. अशा वेळी एकच उपाय शिल्लक राहतो, तो म्हणजे त्याच्या जागी दुसरं हृदय बसवणं.
हृदय प्रत्यारोपण म्हणजे निकामी झालेल्या हृदयाच्या जागी निरोगी हृदय बसवणं. आता असं निरोगी हृदय कुठून आणणार? तर एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीकडून. होय! मृत्यू झाल्यावर काही तासांच्या आत जर त्या व्यक्तीचं हृदय काढून घेतलं तर ते एखाद्या जिवंत माणसाच्या कामी येऊ शकतं. अर्थात हे करण्यासाठी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांची परवानगी हवी. पहिलं प्रत्यारोपण १९६७ मध्ये झालं आणि त्यानंतरच्या पाच दशकांमध्ये त्याचा प्रवास एक प्रयोग ते हृदयविकारावरची एक यशस्वी उपचारपद्धती असा झाला आहे.









