देश स्वतंत्र होण्यासाठी आणि देशातील जनता एकसंध राहावी यासाठी अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे. पण देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होत असताना आजही असे अनेक महान नेते आहेत ज्यांचे कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत आलेले नाही. सैफूद्दीन किचलू हे असेच एक नाव आहे.
सैफूद्दीन किचलू यांना जालियनवाला बाग निषेधातील प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाते. या निषेध सभेनंतरही त्यांनी आपले असामान्य कार्य सुरू ठेवले होते. स्वतंत्र लढा ते देश स्वतंत्र झाल्यानंतरही हिंदू मुस्लिम एकतेसाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य त्यांनी देशाला बहाल केले होते.
किचलूंचे पूर्वज मूळ हिंदू होते. त्यांचे कुटुंब काश्मीरमधल्या बारामुल्लाचे. प्रकाश राम किचलू हे त्यांचे पूर्वज मुसलमान झाले होते. नंतर १८७१ साली काश्मीरमध्ये दुष्काळ पडला तेव्हा त्यांचे आजोबा अमृतसरला आले. किचलूंचे वडील पश्मीना आणि केसरचा व्यवसाय करत होते.
श्रीमंत परिवारात जन्म झाल्याचा थेट फायदा किचलूंना झाला. जगभर प्रसिद्ध असलेल्या केंब्रीज विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. पुढे जर्मनीला जाऊन पीएडी पूर्ण केली. त्याकाळी श्रीमंत घरातली मुले परदेशात शिक्षण घेऊन तिथेच स्थायिक होत, तर काही मात्र देशप्रेमाने झपाटून जाऊन देशात परत येत. किचलूंनी अमृतसरला परत येऊन त्यांनी वकिली कारकीर्द सुरु केली. आता देशातले वातावरण मात्र यावेळी तणावाचे होते. कारण इंग्रज शक्ती क्षीण करण्यासाठी देशातील अनेक महत्वाचे नेते जंग जंग पछाडत होते. किचलू देशातील परिस्थिती बघून शांत राहणे शक्य नव्हते. तसा त्यांचा स्वभावही नव्हता.


