केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रीमंडळाचा विस्तार केला. काही अपेक्षीत तर काही अनपेक्षीत आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश केला. ही रचना करताना काहीशी अपेक्षापूर्ती तर काही उपेक्षापूर्ती अमलात आणून सरकारच्या घटक पक्षात निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार म्हणजे अपेक्षापूर्ती ते उपेक्षापूर्ती - सेनेचा दुरावा संपला ? सहभागी पक्षांशी गळाभेट


१. पांडुरंग फुंडकर
भाजपचे ज्येष्ठ वैदर्भीय नेते पांडुरंग फुंडकर यांना कॅबीनेट मंत्र्याचा दर्जा देऊन मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात आलेले आहे. फुंडकर आधी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष होते.

२. राम शिंदे
प्राध्यापक राम शिंदे यांना बढती दिली आहे. त्यांना कॅबीनेट मंत्र्याचे पद मिळाले आहे. राम शिंदे नगर जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत.

३. महादेव जानकर
जानेवारी २०१५ मध्ये विधान परीषदेवर निवडून आलेले महादेव जानकर युतीतील सहभागी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहेत. त्यांना कॅबीनेट दर्जा मिळाल्याने सहभागी पक्षाची अपेक्षा पूर्ण झाली आहे.

४. संभाजी पाटील -निलंगेकर
संभाजी पाटील - निलंगेकर यांचा कॅबीनेट मंत्री म्हणून समाविष्ट झाल्याने मंत्रीमंडळात "लातूरचा चेहेरा" आलेला आहे.

५. सुभाष देशमुख
सोलापूरचे सुभाष देशमुख यांचा कॅबीनेट मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे.

६. जयकुमार रावल
२००४ पासून सतत निवडून येणारे जयकुमार रावळ आणि विधिमंडळ परीसरात पोलीस अधिकार्याला मारहाण करण्याबद्दल निलंबित झालेले यांना पण कॅबीनेट मंत्रीपद देण्यात आलेले आहे.

७. मदन येरावार
नितिन गडकरी यांचे खास समजले जाणारे मदन येरावार यांना राज्यमंत्रीपद देऊन मुख्यमंत्र्यांनी पक्षांतर्गत कुजबुजीला विराम दिला आहे.

८. सदाभाऊ खोत
मित्रपक्षातील सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री पद देउन स्वाभिमानी शेतकरी पक्षाला मुख्यमंत्र्यांनी जवळीक साधली आहे.

९. रवींद्र चव्हाण
मंत्रीमंडळातील अनपेक्षीत समावेश असे म्हणता येईल ते नाव म्हणजे आमदार रवींद्र चव्हाण यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश.

१०. अर्जुन खोतकर
शिवसेनेशी वाढत गेलेला दुरावा सांधण्यासाठी मुख्यंत्र्यांनी अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्री पद दिले आहे. अर्जुन खोतकर यांचा समावेश म्हणजे जालन्याच्या तरुण तुर्कांचा समवेश समजला जातो

११. गुलाबराव पाटील
शिवसेनेचे दुसरे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना खान्देशची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाते.
प्रादेशिक प्रतिनिधीत्व -तरुणांचा समावेश - मित्रपक्षांच्या हक्काची पोच पावती - पंक्षांतर्गत संशय कल्लोळ- आणि रुसलेल्या पक्षांशी मनोमिलन असा चौफेर ३६०^० विस्तार करून मुख्यमंत्र्यांनी आगामी स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीची सुरुवात केली आहे.