सध्या क्रिप्टोकरन्सीवर कोणतेही नियमन नाही. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि नियामक पावले उचलण्याचे संकेत दिले. क्रिप्टोकरन्सीबाबत नियमन नसल्यामुळे त्याचा वापर टेरर फंडिंग आणि काळ्या पैशाच्या हालचालीसाठी केला जात आहे, असे सरकारचे मत आहे. या पार्श्वभूमीवर आता भारतात या विधेयकाच्या माध्यमातून काय नवे नियम येतात, त्याचा सध्याच्या क्रिप्टो गुंतवणूकदारांवर काय परिणाम होतो हे पाहावं लागेल. सोबतच आरबीआय स्वत:चं डिजीटल चलन आणणार अशीही चर्चा आहे.
एक सत्य असे आहे की क्रिप्टोकरन्सीला रोखता येणार नाही ,परंतु त्याचे नियमन केले पाहिजे असेही बर्याचजणांचे मत आहे. अधिकृत आकडा समोर आला नसला तरी भारतात तब्बल अडीच ते तीन कोटी लोक क्रिप्टोकरन्सीधारक आहेत असं सांगितलं जातं. जगात एल साल्वाडोर हा एकमेव देश आहे ज्यानं क्रिप्टोकरन्सीला अधिकृत चलन म्हणून मान्यता दिली आहे. बाकीच्या देशांत चलन म्हणून मान्यता नसली तरी हे व्यवहार नियंत्रित करण्यासाठीच्या हालचाली सुरु आहेत. भारतातही सध्या क्रिप्टोच्या जाहिराती, त्यात सेलिब्रेटींचाही सहभाग वाढत चाललाय. त्यामुळे वेळीच नियमन केलं नाही तर छोटे गुंतवणूकदार अडचणीत येतीलच, पण देशाच्या अर्थव्यवस्थेलाही धोका पोहचू शकतो असं मत आरबीआय आणि सेबीकडून व्यक्त केलं गेलं आहे.