बोलणाऱ्याच्या एरंड्या खपतात पण न बोलणाऱ्याचे गहू खपत नाहीत अशी मराठीत एक म्हण आहे. जाहिरातींचं युग कधी सुरु झालं असेल हे नक्की सांगता यायचं नाही, पण आरोळी देऊन भाजी-फळे विकणाऱ्या माणसापासून ते टीव्ही-युट्यूब-इंटरनेटवर काही सेकंदांसाठी लाखोकरोडो खर्चून आपली जाहिरात पोचवणाऱ्या उद्योगपतींपर्यंत जाहिरात कुणाला चुकली नाहीय.
जाहिरात माणसाच्या मनाला हात घालते आणि आपल्याला उत्पादनं घ्यायला उद्युक्त करते. बरेचदा या जाहिराती यशस्वी होतात, पण काहीवेळेस त्या इतक्या असंवेदनशील असतात की त्या बनवल्या गेल्या, कुणी मंजूर केल्या आणि आपल्यासमोर का आल्या असाच एक प्रश्न पडतो. कधीकधी या वाईट जाहिरातींमुळे इतकी माती खाल्ली जाते की त्या परत घेण्यासारखी नामुष्कीची वेळही निर्मात्यांवर येते. हे भारतात घडतं आणि हो, जगभरही घडतं.
म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत अशाच काही वादग्रस्त जाहिराती. खरंतर तशा जाहिरातींची यादी बरीच लांबलचक आहे, आपण फक्त त्यांची चुणूक पाहू.











