पन्हाळगडाच्या परिसरात जर तुम्ही पावसाळ्यात-श्रावणाच्या-दरम्यान फिरला असाल, तर सोनचाफ्याची अनेक झाडं सोनेरी फुलांनी बहरलेली पाह्यली असतील. पन्हाळ्याच्या आसपास ही झाडं आढलण्याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रावणात गडावरच्या सोमेश्वराला एक लाख सोनचाफ्याची फुलं वाहण्याचा संकल्प केला होता. त्या संकल्पानुसार पन्हाळ्याच्या आसपास सोनचाफ्याची लागवड करण्यात आली होती.
पण समजा, तुम्ही मुंबई-पुण्यात रहात असाल तर तुमच्या मनात प्रश्न येईल की श्रावण असो वा नसो, सोनचाफ्याची फुलं बाजारात बारमाही मिळतात हे कसं काय? वाचकहो, बाराही महिने बार देण्याचा हा चमत्कार 'वेलणकर चाफा' या कलमाचा आहे. आता तुम्ही म्हणाला सोनचाफा म्हणजे सोनचाफा. त्यात हा वेलणकर चाफा काय वेगळा प्रकार आहे? तर त्याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही घेऊन आलो आहोत. आम्हाला खात्री आहे की वेलणकर चाफ्याची ही कथा 'बोभाटा'च्या अनेक वाचकांना प्रेरित करणार आहे!













