एक गृहस्थ एकदा सांगत होते,
"माझी आई अतिशय उत्तम स्वैपाक करायची. आख्ख्या पंचक्रोशीत तिचा हात धरणारं कोणी नव्हतं.
गावात कोणाकडेही काही विशेष कार्य असलं, की स्वैपाकासाठी तिला बोलावलं जायचं.
सगळे तिच्या स्वैपाकाची फार स्तुती करायचे . पण मरतेवेळी आई मला काय म्हणाली होती, ठाऊक आहे ?
--"बाळा , आयुष्यभर मी सगळ्या गावाकडून स्तुती ऐकली . पण तुझे बाबा काही आयुष्यात कधी म्हणाले नाहीत , की तू चांगला स्वैपाक करतेस म्हणून !त्यांच्याकडून हे चार शब्द ऐकायला मी आयुष्यभर आसुसलेले होते. पण तुझा बाप मरेस्तोवर एकदाही हे एवढं बोलला नाही !"
हे शल्य उराशी घेऊनच त्या बाई वारल्या.
कौतुकाचे चार गोड शब्द.
ते बोलायला ना त्रास पडतो, ना खर्च येतो.
पण प्रामाणिकपणे , वेळच्या वेळी उच्चारले
तर केवढा आनंद निर्माण करतात ते.
आणि आळसापोटी वा अहंकारापोटी वा उदासीनतेपोटी ते बोलायचं टाळतो
तेव्हा आपण अकारण किती दु:ख निर्माण करतो !
सौजन्य : श्री. भानू काळे,
संपादक - अंतर्नाद




