ब्रिटिश जेव्हा आपल्या देशात आले तेव्हा सुरुवातीला त्यांना इथे जुळवून घेणं फार जड गेलं. त्यांना अनेक प्रतिकूल गोष्टींचा सामना करायचा होता. इथलं तुलनेनं उष्ण हवामान, रक्त शोषणारे डास, एकंदर मसालेदार या कॅटेगरीत येणारं भारतीय जेवण, प्रदेशागणिक बदलणारी भाषा सगळंच त्यांच्यासाठी अनोखं आणि नवीन होतं. हळूहळू त्यांनी या गोष्टींशी जुळवून घ्यायला सुरुवात केली, पण एक गोष्ट त्यांच्या आवाक्याबाहेर होती, ती म्हणजे इथला असह्य उकाडा.
आपल्याकडे साधारणतः एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान उन्हाळा असतो. पण हे संपूर्ण देशभरात सगळ्या ठिकाणी सारखं नाही. पावसाळा सुरू होण्याचा काळ आणि उन्हाळ्याची लांबी प्रदेशानुरूप बदलते. काही ठिकाणी हिवाळ्यातपण पाऊस पडतो. एक मात्र खरं, पावसाचं प्रमाण प्रमाण कमी झालं की उकाडा वाढतो आणि असह्य होतो. आपल्या हुशार पूर्वजांनी अर्थातच त्यावर अनेक उपाय शोधून काढलेले आहेत.









