पैसा आणि वेळ या दोन गोष्टी कधीच पुरेशा नसतात असे म्हटले जाते. या दोन्ही गोष्टी एक तर कमी असतात, नाही तर जास्त. कोणत्याही गोष्टीची कमतरता प्रगतीची नांदी असते आणि त्याच गोष्टीचा अतिरेक म्हणजे विनाशाची सुरुवात. बक्कळ प्रमाणात एखादी गोष्ट उपलब्ध असली तर तिच्या वापराचे योग्य पध्दतीने नियोजन करणे गरजेचे असते. योग्य नियोजन नसले तर वरदान असलेल्या गोष्टीचं रुपांतर शापात व्हायला वेळ लागत नाही. अशाच एका अनियोजीत व्यवस्थेचा परिणाम भोगत असलेला देश आहे तो म्हणजे नाउरु.
प्रशांत महासागराच्या मध्यभागात एका बेटावर वसलेला हा देश एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश होता. पण आता २०१७ मध्ये हाच देश जगातल्या सगळ्यात जास्त गरीब देशांच्या यादीत गणला जात आहे. चला तर मग आज आपण याच देशाच्या रंक ते राजा आणि पुन्हा राजापासून रंक होण्याचा प्रवास जाणून घेऊयात.












