ही घटना आहे १९८९ सालची. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होऊन जेमतेम एक आठवडा झाला होता. भारताचे गृहमंत्री म्हणून मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पदभार स्वीकारला होता. ८ डिसेंबरच्या त्या दिवशी गृहमंत्र्यांची अधिकार्यांसोबत पहिली बैठक सुरु होती, काश्मिरच्या लोकांची मानसिकता या विषयावर गृहमंत्री बोलत होते आणि अचानक एका फोन आला......
'त्यांच्या मुलीचे म्हणजे रुबैया सईदचे काश्मिरी अतिरेक्यांनी अपहरण केले आहे.' क्षणार्धात गृहमंत्री आपण देशाचे गृहमंत्री आहोत हे विसरून त्या बातमीच्या ओझ्याखाली दबून गेले. काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण रुबैय्याला सोडवा असा आग्रह करून त्यांनी सगळ्या महत्वाच्या व्यक्तींना फोन केले. थोड्याच वेळात पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग, इन्दरकुमार गुजराल यांच्यासारखी वरिष्ठ मंडळी सईद यांच्या भेटीस आली. रुबैय्या सईद यांची सुटका करण्यासाठी चारी दिशांनी प्रयत्न सुरु झाले.





