जगात गुन्हे, पोलिसखाते, न्यायसंस्था आणि तुरुंग हा कुठल्याच देशाला चुकला नाहीय. एकमेकांशी संबंधित असलेल्या या गोष्टींशिवाय बहुतांश समाज सुरक्षित आयुष्य जगू शकत नाही हे जितकं खरं, तितकीच माणसाला सुधारण्याची संधी मिळायला हवी हे ही तितकंच खरं!! काही देश या सुधारणेच्या शक्यतेवर आणि ती संधी देण्यावर विश्वास ठेवतात आणि आपला भारत त्यांपैकीच एक आहे. शिक्षा झालेल्या कैद्यांना ही संधी दिली जाते- खुल्या कारागृहात!!
शिक्षा झालेल्या, पण चांगली वागणूक असलेल्या कैंद्यांना ओपन प्रिझन किंवा खुल्या कारागृहात ठेवलं जातं. काही देश याला कैदी पुनर्वसन केंद्रही मानतात. खुल्या कारागृहांत कैद्यांना गजांआड बंद ठेवलं जात नाही. त्यांना त्यांच्या भोवतालच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. अगदीच इतर नागरिकांसारखं त्यांचं जीवन मुक्त नसलं तरी इतर तुरुंगांतल्या कैद्यांच्या मानानं याचं आयुष्य बरंच बंधनमुक्त आणि चांगलं असतं. जगाचा इतिहास पाह्यला तर ग्रेट ब्रिटनमध्ये हे प्रयोग खूप झाले आहेत. तिथे वेल्स, स्कॉटलंड, इग्लंड आणि आयर्लंडमध्ये अशी खुली कारागृहं आहेत. पण विकीवरची माहिती खरी मानायची तर ती १९५०-६० नंतर खुल्या कारागृहांमध्ये परिवर्तित झालेले तुरुंग आहेत.





