ठिकाण: दिल्ली. दिवस होता २४ मे १९७१. दिल्लीचे राजकीय वातावरण नेहमीच तापलेले असते त्यामुळे बातम्यांचा तुडवडा कधीच नसतो. पण त्या दिवशी जास्त काही विशेष घडत नसल्याने सगळ्या वर्तमानपत्रांचे रिपोर्टर हे निवांत आपापल्या ऑफिसमध्ये बसून टिवल्याबावल्या करत होते. त्यांना कल्पनाही नव्हती की थोड्याच वेळात एका बातमीमुळे दिल्लीच काय, तर संपूर्ण भारत देशात खळबळ माजणार आहे…
....आणि फोन वाजलाच! सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा पार्लमेंट स्ट्रीट, दिल्ली येथे तब्बल ६० लाखांचा दरोडा पडला होता!
मंडळी, आजच्या तारखेस ६० लाख रक्कम फार किरकोळ वाटू शकेल. पण १९७१ साली ही फार मोठी रक्कम होती. त्या साठ लाखाचे २०१९ चे मूल्य २० कोटीच्यावर आहे. थोड्याच वेळात पोलीस स्टेशन आणि बँकेसमोर सगळे बातमीदार जमा झाले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बँकेत एक फोन आला आणि कुणीतरी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आवाजात बोलून ६० लाख रुपये ताबडतोब मागवून घेतले. आता देशाच्या पंतप्रधान पैसे मागतात म्हटल्यावर कोण नकार देईल? पैसे पाठवण्याची त्वरित व्यवस्था केली गेली. पण नंतर लक्षात आलं की कुणीतरी बँकेला ६० लाखाचा गंडा घातला होता.











