नरहरी शंभुराव भावे यांना केवळ विनोबांचे वडील म्हणणे म्हणजे एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा मोठाच अपमान होईल. विनोबांनी त्यांना 'मोठा अप्रसिद्ध पुरुष', म्हटले असले अथवा शिवाजीराव भावे यांनी विनोबा चरित्रात त्यांना एक प्रकरण दिले असले तरी ते त्यापलीकडे बरेच काही होते. विनोबांच्या साहित्यात, विशेषतः पत्रांमध्ये नरहरपंतांचे मनोज्ञ दर्शन होते.
वैदिक घरात जन्मलेला हा मुलगा, रसायनशास्त्राची कास धरतो आणि तो व्यवसाय निवडतो हीच त्याकाळी अनोखी गोष्ट होती. बडोदा संस्थानात ते रंगाच्या क्षेत्रातील संशोधक म्हणून काम करत होते. हे संशोधन त्यांनी व्यवहारातही आणले. स्वदेशी रुमालावर, स्वनिर्मित शाईने, अक्षरओळख करून देणारे रुमाल त्यांनी तयार केले. एवढेच नव्हे तर ते स्वतः बाजारात नेऊन विकले.








