शहराजवळ नवी सोसायटी तयार होतेय, त्यांच्या जाहिराती आणि सोयीसुविधा पाहून तुम्ही घर घेतलं खरं, पण एखाददोन वर्षांच्या कालावधीत प्रत्येक घरात कोणीतरी आजारी पडायला लागलं. विशेषतः लहान मुलं, काही व्यंगासकटच जन्माला आली, तर काही जन्माला येतायेताच या जगातून गेली. कोणालातरी कॅन्सर झाला. एक अस्वस्थ वातावरण सोसायटीत पसरलं! मग कोणीतरी वास्तूतज्ञाला बोलावलं, त्यालाही काही कळेना. पण सोसायटीत काहीतरी विचित्र घडतंय हे सगळ्यांना कळत होतं. आपण चुकून अण्णा नाईकाच्या घरात राहतोय का काय असं वाटायला लागलं!
थोडा विचार करा ही काल्पनिक परिस्थिती प्रत्यक्षात घडली तर? हो हे घडलंय. भारतात नाही, पण तैवानमध्ये काही वर्षांपूर्वी घडलं आहे. फरक इतकाच की हे आपल्या गृहसंकुलात घडतं आहे हे त्या सदस्यांना फार फार उशीरा कळलं. वाचू या हा काय प्रकार होता..









