'टाटा आणि भारत हे नातंच वेगळं आहे. जमशेदजी टाटांपासून सुरु झालेला हा प्रवास त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्वरुपात अजूनही चालू आहे. या प्रवासातली एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे भारतरत्न 'जे. आर डी. टाटा'!! जे. आर डींच्या उद्योजकत्वाबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. पण त्याहीपलिकडे जाऊन ते एक माणूस म्हणूनही पण खूप मोठे होते. मूल्यं जपणाऱ्या टाटा उद्योगातल्या या महान व्यक्तिमत्वाच्या स्वभावाचे काही पैलू आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी खास घेऊन आलो आहोत.
जे. आर. डी. म्हणून ते सगळीकडे ओळखले जातात. या नावाचं पूर्ण रूप म्हणजे जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा. जुलै २९, १९०४ रोजी फ्रान्समधल्या पॅरिसमध्ये जन्मलेल्या जे.आर. डींनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले आणि उद्योग-देशासाठी सर्वस्व अर्पण केले. जागतिक पातळीवर देशाला पहिल्या रांगेत आणण्यासाठी महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली. हवाई, रासायनिक प्रकल्प देशात सर्वप्रथम आणण्याचे काम त्यांनीच केले. सामाजिक बांधिलकीतून टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टीआयएफएस आदी संस्था उभारल्या. त्यांचे कार्य अतुलनीय आहे.











