"भाव अत्तराचे आज पार कोसळले ...
थेंब पावसाचे जेव्हा मातीत मिसळले...
पहिल्या पावसाच्या शुभेच्छा...."
एकावर्षी या शुभेच्छा संदेशाने धुमाकूळ घातला होता. अति झालं आणि हसू झालं असा तो प्रकार झाला असला तरी पहिल्या पावसात येणारा मातीचा गंध, त्याचा दरवळ किती वेडावणारा असतो हेच या संदेशातून दिसून येतं. हा मातीचा सुगंध तर सगळ्यांनीच अनुभवला असेल. सगळ्यांनाच आवडणारा आणि हवाहवासा वाटणारा. त्याला नावही आहे-पेत्रीचोर.
माती, मातीतली काही द्रव्यं आणि मातीतले जिवाणू यांपासून हा सुगंध तयार होतो. यातले जिवाणू हे या सुगंधाचे खरे उत्पादक. उन्हाळ्यात जेव्हा हे जिवाणू मरून जातात तेव्हा ते एक प्रकारचा जिओस्मिन नावाचा रासायनिक द्रव स्त्रवतात. आपलं मानवी नाक या द्रव्यासाठी अतिशय संवेदनशील असतं. परंतु पहिल्या पावसाचे थेंब जमिनीवर पडत नाहीत तोपर्यंत काही हे द्रव्य काही हवेत पसरत नाही. तर याच जिओस्मिन नावाच्या सुगंधित द्रव्याला कायमचं बाटलीबंद करून हवा तेव्हा त्याचा सुगंध घेता यावा यासाठी उत्तर प्रदेशातलं एक गाव मेहनत घेत आहे!









