भारत हा निसर्गाच्या विविध रूपांनी नटलेला देश. उत्तुंग पर्वतशिखरं, जंगलं, सागरकिनारे, वाळवंट, बर्फाळ प्रदेश अशी संपन्नता आपल्याकडे आहे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत निसर्गाकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे होणारा पर्यावरणाचा र्हास ही चिंतेची बाब बनली आहे. यातूनच अनेक पर्यावरण चळवळी उदयास आल्या आहेत.
भारताच्या पर्यावरण चळवळीच्या इतिहासात एका चळवळीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ती म्हणजे बिश्नोई चळवळ. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी सन १७३० मध्ये जोधपूरजवळच्या एका छोट्याशा खेड्यात खेजरीचं झाड तोडण्यासाठी आलेल्या राजाच्या सैनिकांना अटकाव करत गावातील ३६३ गावकऱ्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. याची सुरुवात झाली ती एका महिलेपासून. अमृतादेवी हे तिचं नाव. हे सर्व गावकरी बिश्नोई जमातीचे होते आणि त्यांच्या जमातीच्या धर्माच्या शिकवणुकीनुसार निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी हा मार्ग पत्करला होता. नक्की काय आहे त्यांचा धर्म आणि त्याची शिकवण तरी काय आहे?












