
हा फोटो कसला आहे हे तुम्हाला सांगायलाच नको. अजूनही हा पंप आपण गावागावात बघतो. सोप्या भाषेत याला हँडपंप असं नाव आहे. लोकप्रिय संस्कृतीत त्याला अनेक टोपण नावंही दिली गेली आहेत. अधिकृत सरकारी भाषेत याचे नाव आहे India Mark II किंवा Sholapur Hand Pump. एकेकाळी महाराष्ट्रातल्या तहानेने व्याकुळलेल्या अनेक खेड्यांना या पंपाने तारून नेले आहे, जीवनदान दिले आहे. आताशा हा पंप फारसा वापरात दिसत नाही. बहुतेक गावात बंद असलेला हा पंप महाराष्ट्राच्या एका ऐतिहासिक कालखंडाचा साक्षीदार आहे. आजच्या लेखाचा उद्देश केवळ या पंपाविषयी माहिती देणे इतकाच मर्यादित नसून या पंपाच्या निर्मिती करणार्या अभियंत्याला धन्यवाद देणे असाही आहे.
हा कालखंड आहे १९६८ ते पुढच्या सत्तरीच्या दशकाचा! पावसासाठी मौसमी वार्यावर अवलंबून असलेल्या महाराष्ट्राला दुष्काळाची एक मोठी निसर्गदत्त परंपरा आहे. या दशकात लागोपाठ अनेक वेळा मौसमी वार्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली होती. सरकारने याला दुष्काळ हा शब्द वापरू नये असे फर्मान काढले होते. दुष्काळाला 'अवर्षण' असे नवे नाव देण्यात आलेले होते. नाव बदलून दुष्काळ कसा कमी होणार ?
सर्वत्र दुष्काळी छावण्या उभारल्या गेल्या होत्या. अमेरिकेने PL 480 य कराराअंतर्गत दिलेल्या लाल गव्हावर आणि लाल ज्वारीवर जनतेची पोटं भरायची वेळ आली होती.




